जळगाव - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काही दिवसांपासून केलेले आरोप व गेल्या आठवड्यात कल्पना इनामदार यांनी दमानियांकडून लाच प्रकरणात अडकविण्याचे षड्यंत्र रचल्याचा केलेला आरोप, या संदर्भात मुंबई पोलिस आयुक्तअंतर्गत विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्या तक्रार अर्जाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी दमानियांच्या कथित कटाच्या चौकशीचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.
खडसे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की गेल्या दोन वर्षांपासून अंजली दमानिया यांनी माझ्यासह कुटुंबीयांवर निराधार व खोटे आरोप करून बदनामी सुरू केली आहे. या आरोपांचे आपण वेळोवेळी जाहीरपणे खंडन केले. त्यांच्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य सरकारने केलेल्या चौकशीतून आढळून आलेले नाही. त्यानंतरही दमानियांकडून आरोपांचे सत्र सुरूच असून, विविध व्यक्तींना प्रलोभन दाखवून त्या आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
दमानियांच्या संदर्भात कल्पना इनामदार यांनी गेल्याच आठवड्यात केलेल्या आरोपाची चौकशी करावी, असे पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिले. त्यावरून त्यांनी आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
- एकनाथ खडसे, माजी मंत्री.
|