पाकिस्तानात होणारी निर्यात थांबली
रावेर (जि. जळगाव) - काश्मीर खोऱ्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे जम्मू-उधमपूर दरम्यान पाकिस्तानला रावेर येथून जाणारे केळीचे 125 ट्रक अडकून पडले आहेत. यामुळे केळीचे मोठे नुकसान झाले असून, 24 जानेवारीपासून जळगाव जिल्ह्यातून पाकिस्तानसाठी होणारी केळी वाहतूक थांबवण्यात आली आहे.
सध्या तालुका व जिल्ह्यातून पाकिस्तानला केळीची मोठी निर्यात सुरू आहे. रोज सुमारे 20 ते 25 ट्रक केळी पाकिस्तानला पाठविली जात आहेत. ही केळी सावदा, वाघोदा, फैजपूर, तांदलवाडी येथे पॅकेजिंग करून खोक्यात भरून पाठविली जाते. मात्र 20 जानेवारीपासून काश्मीर खोऱ्यात हिमवृष्टी सुरू झाली आहे. जम्मू-उधमपूर दरम्यानच्या रस्त्यावर केळीचे ट्रक अडकून पडले आहेत. काही ट्रक जम्मूकडे परत आणण्यात आले आहेत आणि मिळेल त्या भावात ही केळी जम्मूत विकण्यात येत आहे. यामुळे केळी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पाकिस्तानला जाणारे केळीचे ट्रक न भरण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी 25 जानेवारीपासून घेतला आहे. असे असले तरी सध्या दिल्ली, पंजाब, हरियाना, राजस्थान येथे केळीची मागणी वाढली असल्याने भाव स्थिर आहेत.
|