जळगाव - भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची याअगोदर लोकसभा व विधानसभेनंतर झालेली सरकारातील युती कायम आहे. पुढे महापालिका व जिल्हा परिषद, तसेच कोणत्याही निवडणुकीत युती होणार नाही, असे मत राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
भाजप कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. युती तुटली परंतु शिवसेनेच्या सरकारातील अस्तित्वाबाबत बोलताना ते म्हणाले, की त्यांनी सरकारमध्ये राहावे की नाही, याबाबत बोलण्याइतपत मी मोठा नाही, पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरूनच निर्णय होईल; परंतु युती तुटल्याची घोषणा झाली असली, तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर केंद्र व राज्य सरकारमध्ये झालेली युती कायम राहणार आहे. यापुढे मात्र कोणत्याही निवडणुकीत युती होणार नाही. जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढण्यास सक्षम आहोत. आम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. 45 पेक्षा अधिक जागा आम्हाला निश्चित मिळणार आहेत.
जळगावातही स्वतंत्र लढणार
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी भाजपतर्फे आज निश्चित करण्यासाठी आयोजित बैठकीला महाजन पक्षाच्या कार्यालयात उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की युती तुटल्याबाबत आता वरिष्ठ स्तरावरूनच निश्चित झाले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातही युती होणार नाही. जिल्ह्यातील युतीबाबत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्याशी आपण दोनवेळा चर्चा केली. मात्र, त्यांचाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
प्रवेश करणाराचे "मेरिट' पाहणार
इतर पक्षांमधून भाजपमध्ये नेते, कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. या "इनकमिंग'बाबत बोलताना महाजन म्हणाले, की पक्षात अनेक जण प्रवेश करीत आहेत. मात्र, उमेदवारी देताना जिंकण्याचे "मेरिट' पाहूनच उमेदवारी दिली जाणार आहे, त्यामुळे नवीन येणारा आणि आमच्याकडचा जुना कार्यकर्ता असला, तरी तो जिंकून येणार आहे किंवा नाही, याची संपूर्ण माहिती घेऊनच त्यांना उमेदवारी देण्यात येईल.
|