बिबट्याचा धुमाकूळ थांबणार तरी कधी?

leopard
leopard

पिलखोड/मेहुणबारे(ता. चाळीसगाव) - बिबट्याच्या हल्ल्यांनी गिरणाकाठ ढवळून निघाला आहे. वन विभाग बिबट्याला पकडण्यास असमर्थ ठरत असल्याने ग्रामस्थ तीव्र संतप्त झाले आहेत. बिबट्याच्या धाकाने आपल्याच शेतात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. त्यामुळे बिबट्याचा धुमाकूळ कधी थांबणार? असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. सध्या निर्माण झालेल्या बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना काय वाटते, हे 'सकाळ'ने जाणून घेतले. शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

बिबट्याचा सर्व सामान्यांना त्रास

अमजद शेख. दादामियाँ (पिलखोड) : माझी तामसवाडी शिवारात शेती आहे. बऱ्याचदा शेती शिवारात लोडशेडिंग असते. त्यामुळे शेतात रात्रीच्या सुमारास एकटे जाण्यास भीती वाटते. दिवसा गुरे चारणाऱ्या गुराख्यांच्या देखील मनात नेहमी बिबट्या विषयी धास्ती असते. एका ठिकाणी घटना घडली तर त्याची भीती सगळीकडे निर्माण होते. त्यामुळे हा त्रास सर्वसामान्यांना होत आहे.


शेतमजुरीतून मिळणारे पैसे थांबले!
कमलबाई मोरे (पिलखोड) : मी शेतमजूर असून रोज शेतात कामाला जाते. मात्र, बिबट्याच्या धाकामुळे शेतात जाणे बंद केले आहे. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी झाले आहेत. तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात काम करण्याशिवाय आमच्याकडे  दुसरा पर्याय नाही. मात्र, बिबट्यामुळे शेतात जाणे बंद केले आहे.

शेती कशी करवी, हा प्रश्न

प्रशांत पाटील (तामसवाडी) : आम्ही बिबट्याच्या भीतीने अक्षरशः शेतात जाणे बंद केले आहे. शेतात गेलेला माणुस घरी सुरक्षित परतेल यांची शाश्वती नाही. शिवाय बाहेरगावी जरी गेलो तरी, घरची माणसे शेतात गेल्यावर त्यांची काळजी लागुन असते. नाही म्हटल तरी, पिकांना पाणी देण्यासाठी रात्री जोखीम पत्करुन शेतात जावेच लागते. त्यामुळे नरभक्षी बिबट्याला तातडीने जेरबंद करावे.


बिबट्याचे झाले दर्शन

संतोष जगताप (वरखेडे) : माझे शेत दरेगाव रस्त्यालगत असून मी शेतातच वास्तव्यास आहे. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास कुत्र्यांनी गोंगाट केला व कपाशीच्या शेताकडे धावले. त्यापैकी दोन कुत्रे हे घाबरुन घरात येऊन गेले. बॅटरीच्या उजेडात पाहिले असता, भुरकट व अंगावर ठिपके असलेला प्राणी दिसला. शिवाय आज सकाळी साडेआठला दीपाली जगताप यांच्यावर हल्ला झालेल्या ठिकाणाकडे नाल्याजवळुन जाताना मी व पत्नीने पाहिला. त्यामुळे आम्हाला जीव मुठिय ठेऊन राहावे लागत आहे.

शेतीकामांसाठी मजुर मिळेना

नाना रावते (दरेगाव)  : सध्या बिबट्याच्या भीतीमुळे शेतात काम करण्यासाठी मजुर मिळत नाही. त्यामुळे मी स्वतः आजुबाजुच्या परिसरातल्या मजुरांच्या विनवण्या केल्या तरी, कुणी शेतात येण्यास तयात नव्हते. अखेर मी धुळे जिल्ह्यातुन पस्तीस मजुर कापुस वेचणीसाठी आणले. शिवाय संरक्षणासाठी अतिरीक्त दोन जण ठेवावे लागले. बिबट्यामुळे शेतात जाणे कठीण झाले आहे. कुंभकर्णी झोपी गेलेल्या वन विभागाला जाग कधी येणार?

रात्र जागून काढावी लागते

कारभारी गवळी (मालेगाव)  : मी मेंढपाळ असून मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथील रहिवारी आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी व मेंढ्या चराईसाठी वरखेडे भागात आणल्या आहेत. बिबट्या हा आमच्या वाड्यावर देखील येऊन गेला. परंतु, आम्ही सावध असल्यामुळे कुठलिही जीवीहानी झाली नाही. मात्र, आम्हाल जीव मुठीत धरुन राहावे लागते आहे. काही वेळा तर रात्रभर जागरण करावे लागते. त्यामुळे आता हा परिसर सुरक्षित नसल्याने दुसऱ्या तालुक्यात हलवावा लागणार आहेत.
रात्रीचे भारनियमन करु नये

आबा ठोके (वरखेडे)  : मी शेतमजुर असुन सध्या शेतकरीच जात नसल्याने आमच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. बिबट्या हा एक नसून पाच ते सहा आहेत. त्यामुळे कोणता भाग काम करण्यास सुरक्षित असेल हे सांगणे अवघड आहे. दोन तीन दिवसात बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास वेळप्रसंगी आम्ही आंदोलनासाठी रस्त्यावर उतरु. शिवाय वीज वितरण कंपनीने रात्रीचे भारनियमन न करता वीज द्यावी. जेणेकरुन रात्रीच्या सुमारास जाणाऱ्या शेतकऱ्यांना थोडाफार धीर मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com