नाशिक - बारावीच्या इंग्रजी पेपरला झालेल्या कॉप्यांच्या सुळसुळाटाला "सकाळ'ने वाचा फोडली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी कॉपीबहाद्दरांना रोखण्याचे फर्मान सोडल्याने दहावीच्या पेपरची सुरवात कॉपीमुक्त होईल, अशी अपेक्षा होती. पण मंगळवारी मराठीच्या पहिल्याच पेपरला विशेषतः आदिवासी भागात सर्रास कॉपी सुरू असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
परीक्षांवेळी कॉपी पुरवली जाऊ नये, यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून भरारी पथके नेमण्यात आली आहेत. बैठे पथक पाठविण्यात येत आहे; पण कॉप्यांसाठी संवेदनशील असलेल्या भागातील प्रतिबंधात्मक उपाय निरुपयोगी ठरत असल्याचे आज पाहायला मिळाले. एवढेच नव्हे, तर पोलिसांसह शिक्षण विभागातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे "तीन-तेरा' नेमके कोण वाजवत आहे, याचा शोध घेण्याची वेळ आल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
आदिवासींच्या शिक्षणात परीक्षांवेळी होणाऱ्या कॉप्यांमुळे प्रश्नचिन्ह तयार झाले आहे. शिक्षक वर्षभर काय करतात, असा प्रश्न एकीकडे तयार झालेला असतानाच, दुसरीकडे कॉपी पुरविण्यासाठी लोटणाऱ्या जत्रेमधील तरुण शिक्षकांना कसे जुमानत नाहीत, हाही गंभीर प्रश्न बनला आहे. बोरगावच्या ग्रामस्थांनी यापूर्वीच बारावीच्या मायमराठीच्या पेपरवेळी कॉपी करू दिली जाणार नाही, असा संकल्प केला आहे. मात्र पळसनसह उंबरठाणच्या परीक्षा केंद्रावर आज दहावीचा पेपर सुरू असताना तरुणांचा गराडा पडला होता. कॉपी पुरविणारे थेट व्हरांड्यात पोचल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
|