निफाड - सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी; तसेच 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन लागू करावे, यासह इतर मागण्यांसाठी खडकमाळेगावच्या शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला.
खडकमाळेगाव येथे सरपंच साहेबराव कान्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष ग्रामसभा झाली. शेती हाही मोठा उद्योग असल्याने काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन सुरू करावे, दुधाला किमान 50 रुपये लिटर असा भाव मिळावा, सक्षम पीकविमा योजना सुरू करावी, शंभर टक्के अनुदानावर ठिबक व तुषार सिंचन योजना सुरू करण्याबाबतचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत सरकारने निर्णय न घेतल्यास 1 जूनपासून दूध, भाजीपाला, फळे व शेतमाल विक्री बंद आणि पेरणी बंद करून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
|