सराड-वणी राष्ट्रीय महामार्गचे काम बाधीत शेतकऱ्यांनी पाडले बंद

wani
wani

वणी (नाशिक) : गुजरात राज्यातील सोनगड ते पिंपळगाव बसवंत या दरम्यानचा नव्याने जाहिर झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 वरील सराड ते पिंपळगाव बसवंत दरम्यानच्या सुरु झालेल्या रस्त्याच्या नवीन कामासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची अधिग्रहणाची कायदेशीर प्रक्रिया न करता प्रशासनाने महामार्गाचे काम सुरु केल्याचा आरोप बाधित शेेेतकऱ्यांनी केला असून जोपर्यंत अधिग्रहीत जमिनेेेेचे क्षेत्र निश्चिती व मोबदला मिळणार नाही तोपर्यंत महामार्गाचे काम रोखण्याचा इशारा बाधीत शेतकऱ्यांनी दिला आहे.

वणी - सापुतारा या सध्याचा राज्यमार्ग क्रमाक 23 या रस्त्यास केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 म्हणून घोषित केला आहे. या रस्त्यावरील वणी ते पिंपळगाव या 20 किमी अंतराचे पहिल्या टप्प्यातील रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाचेे काम सुरु आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील वणी- सराड दरम्यानच्या रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. सराड ते वणी दरम्यानचा संपूर्ण भाग हा आदिवासी पट्टयात येत असल्याने रस्त्याच्या कामासाठी बहुतांश जमिनी आदिवासी शेतकऱ्यांच्या अधिगृहीत होणार आहे.

दरम्यान यासाठी जिल्हा भूसंपादन अधिकारी महामार्ग प्राधिकरण नाशिक यांनी क्षेत्र मोजणी संदर्भात नोटीसा दिल्या असून त्यानंतर कुठलीही कार्यवाही न करता सदर रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यात करंजखेड व चौसाळे परीसरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात जेसीबी घालून पिकांची नासधुस केली आहे. याबाबत परिसरातील शेतकरी संतप्त होऊन काल (ता. 18) करंजखेड फाटा येथे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत बैठक घेतली. या बैठकीसाठी आमदार नरहरी झिरवाळ, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, भूसंपादन अधिकारी नीतनवरे, रस्ता प्राधिकरणाचे अधिकारी बडगुजर, गटविकास अधिकारी बेडसे तसेच विलास कड, जनार्दन भोये, आनंदराव चौधरी, संजय कड, संजय वाघ, उत्तमराव जाधव, भोजराज चौधरी, पोपट तुंगार, दिनकर जोपळे, रामचंद्र चौधरी, पंडितराव भरसट,  धोंडीराम थैल,  पंडित बागुल, दत्तात्रय तडाखे, हिरामण गायकवाड, घेवर जोपळे, मोहन जोपळे आदींसह शेकडो प्रकल्प बाधीत शेतकरी उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित शेतकर्‍यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना भूसंपादन बाबत वेगवेगळे प्रश्न विचारत धारेवर धरले.  मात्र अधिकाऱ्यांना याबाबत कोणतेही समाधान कारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आमदार  झिरवाळ यांनाच जाब विचारत या प्रश्नात मध्ये लक्ष घालण्याची मागणी केली. आमदारांनी याबाबत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वरिष्ठ पातळीवर तातडीने बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले. दरम्यान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बैठकीत उपस्थिती लावून शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले व याबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक आयोजित करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान या मार्गाचे सुुुुरु असलेले काम बंद करण्यात आले असून जो पर्यंत कायदेशीर भुसंपादन होत नाही व त्याचा मोबदला मिळत नाही. तोपर्यंत रस्त्याचे काम होवू देणार नसल्याची भूमिका संतप्त शेतकऱ्यांनी घेतली आहे.

महामार्ग बाधीत शेतकऱ्यांचे प्रश्न रास्त असून या शेतकऱ्यांना पूर्वी संपादीत केलेल्या क्षेत्राचा मोबदला मिळालेला नाही. आता शेतकऱ्यांना कुठलीही पूर्व सुचना न देता काम सुरु करुन उभ्या पिकाचे नुकसान करणे योग्य नाही. याबाबत वरीष्ठ स्तरावर बैठक घेवून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- आमदार नरहरी झिरवाळ

या प्रश्नाचे गंभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठकीचे आयोजन करून याबाबतचा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेे. वेळप्रसंगी केंद्र शासनापर्यंत हा विषय मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु.
- खासदार हरिश्चंद्र चव्हाण 

अधिकारी सांगत आहे की, हया रस्त्याचे भूसंपादन ब्रिटिश कालीन झालेले आहे.  मात्र याबाबत कोणतेही पुरावे कागदपत्रे अधिकाऱ्यांनाही नाही. त्यामुळे जोपर्यंत कायदेशीरदृष्ट्या भूसंपादन होत नाही व त्याचा मोबदला मिळत नाही. तोपर्यंत रस्त्याचे काम प्रकल्प बाधित शेतकरी होऊ देणार नाही.
- सम्राट राऊत, प्रकल्पबाधीत शेतकरी खोरीपाडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com