फुकट ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनांना तपानंतर गोड बातमी!

teacher
teacher

येवला : गेले आठ ते बारा वर्षां आपल्याला पगार सुरु होईल या भाबड्या आशेवर मोफत ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनांना सरकारने आताशी कुठे गोड बातमी दिली आहे.गेल्या बारा-पंधरा वर्षापासून वाट पाहणाऱ्या कायम विनाअनुदानित शाळा २०१६ मध्ये शासनाने अनुदास पात्र ठरवल्या होत्या.त्यानंतरही दोन वर्षे घालवल्यावर आता कुठे शासनाने या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयानुसार आता जिल्ह्यातील तब्बल ४५ प्राथमिक व माध्यमिक शाळांतील तीनशेवर शिक्षकांना पगार सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाली आहे.

राज्यात २००२ पासून प्राथमिक,माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांच्या परवानगीत कायम शब्द लावत अनुदान देण्याला शासनाने ब्रेक लावला होता.शिक्षक संघटनांच्या रेट्यानंतर २००२ मध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांचा कायम शब्द काढण्याचा निर्णय झाला. तेव्हापासून पुन्हा एकदा २००९ पर्यंत शिक्षक व संघटना अनुदानासाठी भांडत होत्या.अखेर एक व दोन जुलै २०१६ मध्ये शासनाने राज्यातील अनुदानास पात्र शाळांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर पुन्हा दोन वर्षे शिक्षण विभागाला विसर पडला की काय म्हणून याकडे दुर्लक्ष झाले होते.त्यावर आता कुठे २०१६ मध्ये अनुदानास पात्र घोषित केलेल्या खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना, वर्ग तुकड्यांना २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
जिल्ह्यात ३०० तर राज्यात ८ हजार!

२६ शाळांतील १०४ शिक्षक,पाचवी ते सातवीच्या चार शाळांतील आठ शिक्षक तर आठवी ते दहावीच्या १५ शाळांतील १२० शिक्षक अनुदानास पात्र झाले आहेत.मात्र त्यांना आता हक्काचा पगार सुरू होणार आहे.तर राज्यातील १५८ प्राथमिक शाळा व ५०४ तुकड्यांतील १ हजार ४१७ शिक्षक, ५८० माध्यमिक शाळा, १ हजार ५५१ तुकड्यांतील ५ हजार शिक्षक व २००२ शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण ८ हजार ४१९ पदांना वीस टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

संचमान्यतेनुसार मंजूर असलेली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे अनुदानास पात्र राहणार आहेत.विद्यार्थी व शिक्षकांची बायोमेट्रिक प्रणालीद्वारे उपस्थिती नोंद,विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, विद्यार्थी संख्या निकष तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत सहभागी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांचा नंबर केव्हा...
राज्यातील सुमारे नऊशेवर कनिष्ठ महाविद्यालय मूल्यांकन होऊन आंदोलनास पात्रतेच्या वाटेवर आहेत.मात्र शासनाने मागील आठ ते दहा वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान दिलेले नाही.बारावीच्या परीक्षाकाळात प्राध्यापकांच्या संपामुळे हा विषय प्रकर्षाने पुढे आल्यावर थातुरमातुर यादी प्रसिद्ध करून १२१ कनिष्ठ महाविद्यालयांची यादी जाहीर करून प्राध्यापकांची चेष्टाच केली आहे.उर्वरित महाविद्यालयांची यादी केव्हा जाहीर होणार व अनुदान केव्हा मिळणार याची प्राध्यापक आतुरतेने वाट पाहात आहेत.

“२०१६ मधील पात्र शाळांना आता अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.अजूनही अघोषित अनेक शाळा व सर्व कनिष्ठ महाविद्यालये अनुदानासाठी प्रतीक्षेत आहेत.शिक्षक संघटना या मागणीसाठी लढा देतच राहील.”
-गोरख कुळधर,
अध्यक्ष, विनाअनुदानित कृती समिती, नाशिक जिल्हा 


“प्राथमिक व माध्यमिक शाळांची यादी जाहीर करून शिक्षक बांधवाना अनुदान दिल्याने आनंदच झाला आहे.आता शासनाने राज्यातील सर्व पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची त्वरित यादी जाहीर करून सोबतच अनुदानाचा जीआर देखील काढावा.”
एम.पी.गायकवाड, अध्यक्ष,कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com