विमानसेवा ठरणार उद्योग विकासासाठी पूरक

विमानसेवा ठरणार उद्योग विकासासाठी पूरक

जळगाव - जळगावकरांचे विमानसेवेचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न साकार होत असून, २३ डिसेंबरपासून जळगावातून मुंबईकडे पहिले ‘टेक ऑफ’ होणार आहे. या विमानसेवेमुळे जळगावातील उद्योग- व्यापार क्षेत्राच्या विकासासाठी पूरक ठरणार आहे. जळगावच्या एमआयडीसीत नवीन उद्योग येणे, तसेच बंद पडलेले उद्योग सुरू करण्यास देखील मदत होऊ शकणार असल्याने ही वाहतूक जळगावसाठी भराभराटीची राहणार असल्याच्या प्रतिक्रिया शहरातील उद्योजक व व्यापाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्‍त केल्या.

विमानसेवेमुळे व्यापार, उद्योगात भरभराट होणार आहे. कारण, दळणवळणाच्या दृष्टीने जळगावात केवळ हवाई वाहतुकीची कमतरता होती, ती पूर्ण होत आहे. उद्योग क्षेत्रातील स्पर्धेत टिकायचे असेल, तर हवाई वाहतूक आवश्‍यक आहे. ही वाहतूक लवकर होणे अपेक्षित होते. पण उशिरा का होईना हवाई वाहतूक सुरू होण्याचा आनंद आहे. यामुळे नवीन मोठ्या इंडस्ट्रीज जळगावात येऊ शकतील आणि जळगावचा विकास होऊ शकेल. केवळ आता नॅशनल हायवेचे काम लवकर व्हायला हवे.
- पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष, राज्य व्यापारी महासंघ.

सर्वच बाबतीत जळगाव हे मध्यस्थानी आहे. रोड, रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने मुंबई, नागपूर, पुणे यांच्यासाठी मध्यस्थान असताना केवळ हवाई वाहतुकीचा अभाव होता. हे सुरू होण्यासाठी खूप वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. ते आता पूर्ण होत असून, याचा फायदा निश्‍चितच जळगावच्या उद्योग क्षेत्राला होणार आहे. बाहेरून येणारे उद्योजकांचे प्रतिनिधी येऊ शकतील. तसेच नवीन उद्योग येण्यास देखील निश्‍चित मदत होणार आहे. तर जळगावातील ज्या कंपन्या बंद पडल्या आहेत; त्या देखील सुरू होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
- भुवनेश्‍वर सिंग, अध्यक्ष, जिंदा संघटना.

जळगावात विमान सेवा नव्हती. ती प्रत्यक्षात येत असल्याने, ही ‘कनेक्‍टिव्हिटी’ जळगावच्या उद्योग- व्यापाराला होणार आहे. जळगावातील चटई ही जगभरात पोचत असते. त्यादृष्टीने उद्योजकांना उत्पादित वस्तूंचे मार्केटिंग करण्यास देखील हे सोयीचे ठरणार आहे. शिवाय बाहेरील मोठ्या उद्योजकांचे प्रतिनिधी आतापर्यंत यायला तयार नव्हते, ते हवाई वाहतूक सुरू झाल्याने निश्‍चित येतील. आयटी क्षेत्राच्या दृष्टीने विचार केल्यास याला देखील ‘स्कोप’ मिळू शकेल. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने देखील जिल्ह्याला चालना मिळेल.
- किरण राणे, उपाध्यक्ष, जिंदा संघटना.

विमानसेवा जळगावात सुरू होत असल्याचा आनंद आहे. यामुळे मुंबई- पुणे याशिवाय परदेशातील उद्योजकांचा संपर्क वाढेल. आपल्याकडे निर्माण होणारा बहुतांश माल रेल्वे किंवा रोडवरील वाहतुकीमुळे बाहेर जात नसे; पण आता विमानसेवेमुळे हे शक्‍य होणार आहे. नवीन मोठे उद्योग येतील. पण यासाठी जिल्ह्यातील राजकीय मंडळींनी यात पुढाकार घेऊन बाहेरचे उद्योग, नवीन प्रोजेक्‍ट कसे आणता येतील यासाठी प्रयत्न करायला हवे. यामुळे औरंगाबादच्या तुलनेत जळगावात देखील एक चांगली उद्योगनगरी तयार होईल. नवीन उद्योग आल्यास येथील इंजिनिअर्सला देखील चांगला रोजगार मिळू शकेल.  
- हरीश यादव, चटई उद्योजक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com