राजकीय दबावामुळे शहराचा विकास खुंटला - रमेश जैन

राजकीय दबावामुळे शहराचा विकास खुंटला - रमेश जैन

जळगाव - महापालिका मालकीच्या १८ व्यापारी संकुलांतील मुदत संपलेले गाळे दोन महिन्यांच्या आत ताब्यात घ्यावे, असे आदेश खंडपीठाने महापालिकेला दिले होते. ही मुदत संपली असून राजकीय दबावामुळे कारवाई थांबलेली आहे. तसेच शहरातील विविध विकासकामे हे शासनाकडून थांबवून महापालिकेची कोंडी करत असल्याचा आरोप खानदेश विकास आघाडीचे नेते रमेश जैन यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. 

श्री. जैन म्हणाले की, महापालिकेच्या मालकीचे मुदत संपलेले गाळे दोन महिन्यांत ताब्यात घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले. मात्र, महापालिका प्रशासनाने अद्यापही कार्यवाही का केली नाही. राजकीय दबावातून शासनाकडून ही कार्यवाही थांबविलेली असल्याचा आरोप रमेश जैन यांनी केला. तसेच न्यायालयाचे आदेश असताना देखील दोन महिन्यांत कार्यवाही न केल्याने महापालिकेकडून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे. त्याचे परिणाम संबंधितांना भोगावे लागतील, असे जैन यांनी सांगितले. 

उत्पन्नाचे मार्ग बंद करून कोंडी
गाळे लिलावातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळून मोठ्या प्रमाणात विकासकामे महापालिकेच्या माध्यमातून होतील. परंतु हे उत्पन्नाचे मार्ग शासनाकडून बंद करण्यात आले आहेत. तसेच राजकीय दबावातून महापालिकेची कोंडी केली जात असून हा सर्व प्रकार जळगावकरांनीही समजत असून शहराचा विकास थांबला आहे.

२५ कोटींचा तिढा आमदारांमुळे  
शहराच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. त्यानंतर हा निधी आम्ही पाठपुरावा करून मिळविला. मात्र गेल्या दीड-वर्षांपासून या निधीतून होणाऱ्या कामांचा तिढा आमदार सुरेश भोळे हेच करीत आहेत. तसेच हा निधी कोणत्या कामांवर खर्च करायचा, हे महापालिका सभागृह ठरवेल. यामध्ये आमदारांचा काय संबंध आहे? एलईडी लाईट्‌सला विरोध करणारेच आमदार हे आपल्या निधीतून शहरात एलईडी लावून त्यावर आपल्या नावाचा फलक लावत आहेत, असा आरोपही जैन यांनी केला. 

चोराच्या उलट्या बोंबा - माळी
जळगावकरांनी आमदार सुरेश भोळे यांना मत देऊन विजयी केले आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यांनी कुठल्या उद्यानास नाव देणे, खुला भूखंड देणे, व्यक्तिगत नामकरणाचे निवेदन दिलेले नाही. त्यांनी नागरिकांचे मूलभूत सुविधांबाबत अप्पर आयुक्तांना निवेदन दिले आहे. शहराच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी आमच्या नेत्यांनी मागणी करून आणला. मात्र ‘खाविआ’ फुकटचे श्रेय घेत आहे. तसेच या निधीबाबत आमदारांना ‘मालामाल विकलीचे डायरेक्‍ट’ म्हणून नितीन बरडे यांनी बालिश विधान केले आहे. मुळात ‘खाविआ’लाच शहराचा विकास होऊ द्यायचा नसून आमदारामुळे कामे होत नसल्याचा आव ते आणत आहेत. त्यामुळे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ सुरू आहेत, असे भाजपचे गटनेते सुनील माळी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com