जळगाव - कर्जमाफीचे अर्ज वेबसाइटवर अपलोड होत नसल्याने राज्यातील कर्जमाफीचा प्रश्न अडचणीत सापडला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी उद्या (ता.28) मुंबईत राज्यातील सर्व बॅंकांचे अधिकारी, त्या बॅंकेतील आय.टी. डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यात आले आहेत. तेवढ्याच शेतकऱ्यांच्या 1 ते 66 नमुन्यातील माहितीचेही ऑडिट केले आहे. नंतर आलेल्या आदेशानुसार मराठीतील मजकुराचे इंग्रजीत तर इंग्रजीतील मजकुराचे मराठीत भाषांतरही झाले आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, असे सांगण्यात आले. मात्र, आता सर्वच बॅंकांच्या याद्या यशस्वीरीत्या अपलोड होत नसल्याने कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात अडचणी येत आहे. हा घोळ राज्यात सर्वत्र आहे. यावर काय तोडगा काढता येईल, यासाठी उद्या (ता.28) बॅंक अधिकारी, आय. टी. डिपार्टमेंटची मंत्रालयात सकाळी अकराला बैठक बोलाविली आहे.
|