दलालीच्या आडून लाखोंची हेराफेरी!

दलालीच्या आडून लाखोंची हेराफेरी!

दोन ट्रक मूग लंपास; मध्य प्रदेशातील पथक जळगावात ठाण मांडून
जळगाव - डाळ उद्योगातील दलालांनी मध्य प्रदेशातून मागवलेला दोन ट्रक मूग लंपास करून व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेश पोलिसांत दाखल गुन्ह्यात तपास पथक जळगावात ठाण मांडून आहे. मात्र, तिघे दलाल पसार झाले असून, जळगाव पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात कर्नाटक येथील व्यापाऱ्यांकडून तीस लाखांवर माल मागवून फसवणूक करणाऱ्या त्रिकुटानेच मध्य प्रदेशातही हा दरोडा टाकल्याचा जळगाव पोलिसांचा अंदाज असून, संयुक्त पथकामार्फत त्यांचा शोध सुरू आहे.

फसवणूक आणि तपास
मध्य प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिमरानी पोलिस ठाणे (जि. हरदा) हद्दीत श्रीकांत गोयल यांच्या मालकीच्या ‘वसुंधरा ट्रेडर्स’कडून २१ व २२ मार्च २०१७ ला सलग दोन वेळा दोन ट्रक मूग मागवण्यात आला. यापूर्वीही संबंधित एजंटद्वारे एक वेळा व्यवहार झाला असल्याने गोयल यांच्या कंपनीने माल पाठवून दिला. मात्र, पंधरा दिवसांच्या ठरलेल्या मुदतीत पैसे न मिळाल्याने अस्वस्थ होत चाचपणी सुरू झाली. संबंधित व्यक्तींनी फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर गोयल यांच्या वतीने तिमरानी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याच्या तपासासाठी मध्य प्रदेश पोलिस दलाचे एस. रघुवंशी व पथक शहरात आले होते. संशयितांचा शोध घेण्यासाठी त्यांनी जळगाव पोलिसांची मदतही घेतली. मात्र, तिघे दलाल फरारी झाले.

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
‘जगदंबा ट्रेडर्स’चा मालक प्रीतेश ऊर्फ निकी ललित अग्रवाल, ‘देवांग एन्टरप्रायजेस’चा संचालक राजेंद्र ऊर्फ राजू विष्णूलाल तिवारी, ‘श्‍वेता एन्टरप्रायजेस’चा मालक व टोळीचा ‘मास्टरमाइंड’ पुरुषोत्तम रामरतन ओझा (शर्मा) यांच्या नावे मध्य प्रदेश पोलिसांत फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ओझा याच्या ओळखीतून ‘वसुंधरा ट्रेडर्स’ येथून २५९ क्विंटल वीस लाखांचा मूग ‘वायद्या’वर मागविला असून, मालही लंपास व पैसाही मिळाला नाही म्हणून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्नाटकातही गुन्हा दाखल
ओझाविरुद्ध कर्नाटकातही फसवणुकीसंदर्भात गुन्हा दाखल असून, तेथून व्यापाऱ्याकडून दोन ते तीन ट्रक माल उचलून घेत, त्याचे पैसेच दिले नाही, म्हणून तेथील पोलिस गेल्या आठवड्यात शहरात आले. पाच दिवस संशयितासह त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला. मात्र, कर्नाटक पोलिसांना खाली हात परतावे लागले.
 

दलालांची ‘दगळीचाळ’!
जळगाव शहराने गेल्या तीस वर्षांत डाळींच्या निर्यात क्षेत्रात चांगली कामगिरी बजावत ‘डाळनगरी’चा लौकिक प्राप्त केला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह इतर राज्यांतून कच्च्या मालाची आवक होऊन त्यापासून तयार होणारी डाळ जवळपास बावीस देशांना निर्यात करण्यात येते. जळगावच्या डाळीला महाराष्ट्रासह देशभरात बऱ्यापैकी मागणीही असते. डाळ व्यवसायाने अनेकांना कोट्यधीश केले आहे. असे असताना काही दलालांच्या हेराफेरीमुळे जळगावनगरी बदनाम होऊन अन्य राज्यांत दलालांची ‘दगळीचाळ’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com