जळगाव - राज्यात येत्या 25 जुलैला राजकीय भूंकप होईल. त्याचा केंद्रबिंदू उत्तर महाराष्ट्रातील जळगाव असणार आहे. त्याच बळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पाचोरा येथे सोमवारी शेतकरी मेळाव्यात बोलताना केला. "तत्वत:' हा शब्द मान्य नसून सरसकट कर्जमाफी होईपर्यंत शिवसेनेचे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठवाड्यातील दौरा पूर्ण करून संजय राऊत दोन दिवसांपासून खानदेशात आहेत. पाचोरा येथे राजीव गांधी भवनात शिवसेनेतर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन आज केले होते. यावेळी सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ आदी उपस्थित होंते. राऊत म्हणाले, ""राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली परंतु त्यातील "तत्वत:' हा शब्द आम्हाला मान्य नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिल्याशिवाय शिवसेनेनेचे आंदोलन थांबणार नाही ते सुरूच राहणार आहे. येत्या 25 जुलैला राज्यात राजकीय भूंकप होणारच आहे. त्याचा केंद्र बिंदू जळगावसह उत्तर महाराष्ट्र असणार आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणच बदलणार आहे. बदलावरच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील. विदर्भाच्या बळावर भाजपचा मुख्यमंत्री झाला, आता उत्तर महाराष्ट्राच्या बळावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईलच.''
राष्ट्रपती भवनावर भगवा
देशातील सर्वोच्च स्थान असलेल्या राष्ट्रपती भवनावर भगवा फडकविणारच असा उल्लेख त्यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, 'देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेच योग्य आहे. ते राष्ट्रपती व्हावेत यासाठी शिवसेना प्रयत्न करीत आहे.''
तातडीने मुंबईला रवाना
खासदार संजय राऊत जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. पाचोरा येथील सभा आटोपून ते जळगावात येणार होते. मात्र उध्दव ठाकरे यांचा फोन आल्याने जळगावचा दौरा रद्दन ते तातडीने नाशिकमार्गे मुंबईकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले.
|