1300 कोटींच्या नुकसानीचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज
नाशिक - अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जिल्ह्यातील चार हजार 228 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना दणका बसल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे सुरू झाले आहे.
सद्यःस्थितीत नुकसानीचे क्षेत्र, उत्पादन आणि बाजारभावाचा विचार करता तेराशे कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे दिसून येत आहे. सर्वाधिक एक हजार 459 हेक्टरवरील डाळिंबाचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, डाळिंबाखालोखाल एक हजार 388 हेक्टरवरील कांद्यासह 746 हेक्टरवरील भाजीपाला, 358 हेक्टरवरील टोमॅटो, 169 हेक्टरवरील द्राक्षे, 60.2 हेक्टरवरील मिरची आणि 38.7 हेक्टरवरील मक्याचे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने 32 गावातील 10 हजार 971 शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. याशिवाय देवळा, निफाड, कळवण, इगतपुरी अशा एकूण 77 गावांतील 12 हजार 194 शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे.
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना फॅक्स
जिल्ह्यातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करून सरकारने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार यांनी केली आहे. आपत्तिग्रस्त पाहणी केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फॅक्सद्वारे निवेदन पाठवले आहे.
तसेच शेतकऱ्यांचे कर्ज आणि वीजबिल माफीचा आग्रहही धरला आहे.
दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी संघर्षाला सुरवात केली आहे. मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता.
|