धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यावरून महंतांमध्ये नाराजी

धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यावरून महंतांमध्ये नाराजी

नाशिक - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढताना तेथील मूर्ती विधीपूर्वक दूर करण्याची साधू व महंतांनी बैठकीत मागणी केली होती. पोलिस व महापालिका प्रशासनाने यासाठी संमतीही दाखविली होती. प्रत्यक्ष मोहीम राबविताना पोलिस व महापालिकेकडून मंदिरांवर थेट बुलडोझर चालविले जात आहेत. त्याबद्दल साधू-महंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमधील कायदा व सुव्यवस्था पुन्हा बिघडविण्यास पोलिस हातभार लावत असल्याचा आरोपही त्यांनी बैठकीत केला.

नाशिकमधील २००९ नंतर बांधकाम केलेल्या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिका व पोलिस प्रशासनाने ८४ धार्मिक स्थळांची यादी करून त्या-त्या मंदिरांच्या दरवाजावर अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा चिकटवल्या आहेत. दिवाळीनंतर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व त्र्यंबकेश्‍वर आखाडा परिषदेच्या साधू-महंतांबरोबर बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

त्या वेळी साधू-महंतांनी अतिक्रमण हटविण्यास आमचा विरोध नाही. मात्र, महापालिकेने तयार केलेल्या या यादीचे पुनर्सर्वेक्षण करून लोकांच्या आक्षेपांचे निरसन करावे. प्रशासनाने रात्री अंधारात मंदिरांचे अतिक्रमण हटविल्याबद्दल साधू-महंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वामी सागरानंद सरस्वती आश्रमात आज कार्यक्रमानिमित्त जमलेल्या साधू-महंतांनी या विषयावर बैठक घेऊन पोलिस व महापालिकेच्या कृतीचा निषेध केला. आनंद आखाड्याचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती, आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत डॉ. बिंदू महाराज, निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्‍वर सोमेश्‍वरानंद सरस्वती व इतर आखाड्यांचे महंत उपस्थित होते.

अतिक्रमित धार्मिक स्थळ हटविण्याला आमचा विरोध नाहीच. धर्मभावना व लोकभावनेचा विचार प्रशासन व पोलिसांनी न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

साधू-महंतांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्याचा पोलिसांचा काय हेतू आहे, हे समजण्यास मार्ग नाही. भंगार बाजार हटविण्यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू असताना, पोलिस महापालिकेला संरक्षण पुरविण्यास टाळाटाळ करतात; तर धार्मिक स्थळे हटविण्यासाठी पुढाकार घेतात, हे योग्य नाही.
- डॉ. बिंदू महाराज

आम्ही केलेल्या मागण्यांबाबत प्रशासन व पोलिसांनी उदासीनता दाखविली. मूर्तींचा अवमान करण्यापेक्षा सन्मानाने त्या हलविता येणे शक्‍य होते. आम्ही या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार आहोत.
- महामंडलेश्‍वर सोमेश्‍वरानंद सरस्वती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com