जळगाव - आंब्यांचे नाव काढले की तोंडाला पाणी सुटते. अनेक महिला आंब्यापासून आंबावडी, आंब्याची पोळी यासह विविध पदार्थ बनवितात. यंदा आंब्याची आवक जास्त झाल्याने आंबेही स्वस्त झाले आहेत. एरवी पन्नास ते साठ रुपये किलोने मिळणारा बदाम आंबा चक्क तीस रुपये दराने तर रत्नागिरी हापूस आंबा तीनशे ते साडेतीनशे रुपये डझनाप्रमाणे मिळत आहे.
जळगाव जिल्हा जसा केळीसाठी प्रसिद्ध आहे. तसा तो सध्या आंब्यासाठीही चर्चेत आहे. गेल्या महिनाभरापासून सर्वत्र आंबे बाजारात पहावयास मिळत आहे. बाजारात आंबे विक्रेत्यांच्या गाड्या अधिक बघायला मिळतात.
अनेकांना मिळाला रोजगार
आंब्यांची आवक वाढल्याने अनेकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. जळगावला दररोज पन्नास टनाची आवक परराज्यातून होत असते. आंबा गोलाणी मार्केट, बागवान मोहल्ल्यात उतरविला जातो. तेथून अनेक जण लोटगाड्यांवर विक्रीस रवाना होतात. सोबतच आंबे ट्रकमधून उतरविणे, गोडावूनपर्यंत नेणे यातून अनेक महिलांनाही रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे.
आंब्याचे सध्याचे दर असे
बदाम- 30 रुपये किलो
बेगम फल्ली--30
केशर- 60, गुजरात केशर- 60
सॉऊथचा केशर- 20 ते 30 रुपये
रत्नागिरी हापूस- 300 ते 350 डझन
देवगड हापूस- 400 रुपये डझन
जळगावकरांना यंदा अतिशय स्वस्त आंबे मिळत आहेत. आवक जास्त होत असल्याने दर कमी झाले आहे. आंबेविक्रीतून अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
-जाफर पैलवान, आब्यांचे व्यापारी
|