नाशिक - मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या जमिनीच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असून, या मार्गावरील तीन मोठ्या नद्यांच्या पुलांसाठी विशेष समिती पुढील आठवड्यात सर्वेक्षण सुरू करणार आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी पाठपुरावा करणाऱ्या संघर्ष समितीप्रमुख मनोज मराठे यांना प्रमुख सर्वेक्षण अधिकारी दीपक पाटील यांनी ही माहिती दिली.
मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या मार्गात येणाऱ्या नर्मदा, तापी आणि गिरणा या तीन
मोठ्या नद्यांवर उभाराव्या लागणाऱ्या मोठ्या पुलांच्या कामासाठी पुढील आठवड्यात सर्वेक्षण सुरू होणार आहे. सध्या उन्हाच्या तीव्र लाटेमुळे सर्वेक्षणाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. रेल्वेमार्गाच्या योजनेसंदर्भात जहाज वाहतूक मंत्रालयाने विशेष लक्ष घातलेले आहे.
रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत या मार्गाबाबत नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हेही उपस्थित होते. या मार्गावर फारशी प्रवासी वाहतूक मिळणार नाही, असा मुद्दा अधिकाऱ्यांनी उपस्थित करताच मार्ग उभारण्यापूर्वी तुम्ही प्रवाशांची संख्या अपेक्षित धरण्याची मनोवृत्ती चुकीची असून, मार्ग झालाच पाहिजे, असे स्पष्ट केले. या मार्गावर इंदूर-देवास आणि महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळेल, ज्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले. या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनी राज्य सरकारे अधिग्रहण करणार असून, रेल्वे आणि बंदरांचे एकत्रित जाळे उभारण्यासाठी भारतीय रेल बंदर प्राधिकरण स्थापन करण्यात आले असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यासाठी रेल्वे आणि जवाहरलाल नेहरू बंदर अर्थसहाय्य पुरविणार आहे. या मार्गाचे लवकरच भूमिपूजन होईल, अशी आशा डॉ. भामरे यांनी या वेळी व्यक्त केली.
|