सरकारकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी - खासदार सुप्रिया सुळे

अमळनेर - हल्लाबोल आंदोलनप्रसंगी व्यासपीठावर चूल पेटवून शासनाचा निषेध करताना खासदार सुप्रिया सुळे. शेजारी सुनील तटकरे, चित्रा वाघ, डॉ. सतीश पाटील, अनिल पाटील, सुनीता पाटील, तिलोत्तमा पाटील आदी.
अमळनेर - हल्लाबोल आंदोलनप्रसंगी व्यासपीठावर चूल पेटवून शासनाचा निषेध करताना खासदार सुप्रिया सुळे. शेजारी सुनील तटकरे, चित्रा वाघ, डॉ. सतीश पाटील, अनिल पाटील, सुनीता पाटील, तिलोत्तमा पाटील आदी.

अमळनेर/ चोपडा/ पारोळा - ‘बहुत हो गयी महंगाई की मार... अब की बार मोदी सरकार’, अशी घोषणा करत भाजप सत्तेवर आले. मात्र, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. दुसरीकडे मोदी सरकार हे जनतेच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी करीत आहे. या मायबाप सरकारला स्वतःची जाहिरात करावी लागत आहे, ही देशाची मोठी शोकांतिका आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केली.
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या अमळनेर, चोपडा व पारोळा येथील जाहीर सभांत त्या बोलत होत्या. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री भास्कर जाधव, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, ‘युवक’चे अध्यक्ष संग्राम कोते, सुरेखा ठाकरे, राजीव देशमुख, गफ्फार मलिक, जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल भाईदास पाटील, ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, जयदेवराव गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा विजयाताई पाटील, माजी आमदार प्रा. दिलीप सोनवणे, ललित बागूल आदी उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक भाषणाच्या वेळी मोठमोठी स्वप्ने दाखवतात. भाषण करण्याचे कौशल्य असल्याने खोटेही ते खरे करून सांगतात. त्यांचे केवळ तोंडच चालते, मात्र कान चालत नाहीत. मुंबई येथे शिवाजी महाराज स्मारकाच्या निव्वळ कार्यक्रमासाठी पाच कोटी व जाहिरातींवर चौदा कोटी असा १९ कोटींचा खर्च करण्यात आला. हा खर्च जर पाडळसे धरणासाठी दिला असता, तर बरे झाले असते. स्वच्छता अभियानाचे खरे प्रवर्तक माजी उपमुख्यमंत्री (कै.) आर. आर. पाटीलच आहेत. त्यांची पोकळी आजही पक्षाला जाणवत आहे. 

सरकारला ऑफलाइन करा- तटकरे 
प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले, की ‘खोटे बोल पण रेटून बोल’, अशी भूमिका या खोटारड्या सरकारने लावून धरली आहे. कृषी सन्मान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची हेळसांड केली जात आहे. शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना ७१ हजार कोटींची सरसकट कर्जमाफी केली होती. मात्र, जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होत नाही तसेच सातबारा उतारा कोरा होत नाही, तोपर्यंत हल्लाबोल आंदोलन सुरूच राहील. ऑनलाइनमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यासाठी जनतेने या ऑनलाइन सरकारला ऑफलाइन करण्याची गरज आहे. 

भाजपची पीछेहाट सुरू - वळसेपाटील
दिलीप वळसेपाटील म्हणाले, की मोदी सरकारने अच्छे दिन, भ्रष्टाचारमुक्‍त भारत, काळा पैसा, दरवर्षी दोन कोटी रोजगारनिर्मिती अशी अनेक आश्‍वासने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही आश्‍वासन पूर्ण झालेले नाही. भाजपने केलेल्या नवीन सर्व्हेच्या अहवालानुसार आगामी निवडणुकांत आपली सत्ता येत नसल्याचे पाहून नवीन मुद्दे ते शोधत आहेत. भाजपची पीछेहाट सुरू झाली असून, त्याचा प्रत्यय गुजरातच्या निवडणुकीत आला आहे. ‘मन की बात’ म्हणणारे पंतप्रधान मोदी हे विजय मल्ल्या, ललित मोदी यांच्या बाबतीत मौन का बाळगतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला. धर्मा पाटलांसारख्या वृद्ध शेतकऱ्याला मंत्रालयात येऊन आत्महत्या करावी लागली. सद्यःस्थितीत फडणवीस सरकारने ४ लाख ५० हजार कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. यात कोणताही घटक समाधानी नाही. शिवसेनाही बोटचेपे धोरण अवलंबत आहे. भ्रष्टाचाराबाबत हे सरकार नाथाभाऊंना वेगळा न्याय व इतरांना वेगळा न्याय देत आहे.

‘ताईं’कडून ‘दादां’चे कोडकौतुक 
जास्त गोड बोलणाऱ्यांपासून सावध राहावे. कडू बोलणारा नेहमी चांगला असतो. याचाच प्रत्यय म्हणजे आपले अजितदादा होय. अजितदादा हे दादागिरी करणारे नसून, जनतेचे हित जोपासणारे प्रेमाचे दादा आहेत, अशा शब्दांत त्यांचे कोडकौतुक खासदार सुप्रिया सुळेंनी अमळनेर येथील भाषणात केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com