बुरशीयुक्त शेवया उठल्या जिवावर 

बुरशीयुक्त शेवया उठल्या जिवावर 

जळगाव ः अंगणवाडीत बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील शेवयांचे प्रकरण शालेय पोषण आहाराप्रमाणे गाजू लागले आहे. बुरशीयुक्‍त शेवयांचा पुरवठा आणि आता असोदा येथे शेवया खाल्ल्याने बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या शेवया बालकांच्या जिवावर उठल्या असून, याबाबत आवाज उठविणाऱ्या सदस्यांचा आवाज सभागृहातच दाबला जात आहे. प्रशासनात मात्र कारवाईबाबत बोंबाबोंब दिसत आहे. 

अंगणवाडीतील बालकांसाठी पुरवठा झालेल्या शेवयांना बुरशी लागल्याचे पाचोरा तालुक्‍यातील आंबेवडगाव येथील अंगणवाडीत तीन महिन्यांपूर्वी उघडकीस आले होते. त्यावेळपासून जिल्हा परिषदेच्या तीन सर्वसाधारण सभा आणि तीन स्थायी समिती सभांमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव देखील झाला आहे. परंतु, प्रत्येक मिटींगमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश नसून, माल बदलून घेण्याचे उत्तर महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रफिक तडवी यांच्याकडून दिले जात आहे. शेवया प्रकरणात भाजपचे जयपाल बोदडे, पल्लवी सावकारे, शिवसेनेचे नानाभाऊ महाजन, रावसाहेब पाटील, राष्ट्रवादीचे शशिकांत साळुंखे यांचा वेळोवेळी उठणारा आवाज प्रशासनाकडूनच दाबला जात आहे. ही प्रशासनाची मुजोरी असल्याच्या भावना जि. प. सदस्यांमध्ये निर्माण होऊ लागल्या आहेत. 

कारवाई केव्हा? 
अंगणवाडीत बालकांना विषबाधा झाल्याचा प्रकार असोदा येथे घडला. याबाबत रवी देशमुख यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे तक्रार केली. तसेच महिला बालकल्याण अधिकारी रफिक तडवी यांना बोलावून त्यांना धारेवर धरले. घडल्या प्रकाराबाबत तडवी यांना तंबी देत तीन दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. पण, देशमुखांच्या या इशाऱ्यानंतर आता प्रशासनाकडून कारवाई केव्हा केली जाते, याबाबत सदस्यांमध्ये उत्सुकता आहे. 

मालाची पुन्हा तपासणी 
पाचोरा तालुक्‍यात बुरशीयुक्‍त शेवया आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमधील मालाची तपासणी करण्यात आली होती. यावेळी जवळपास सर्वच तपासणी अहवाल "नील' आले होते. मात्र, असोदा येथील प्रकारानंतर अंगणवाड्यांमधील पुरवठा झालेल्या मालाची तपासणी करण्याच्या सूचना सीईओंनी महिला व बालकल्याण विभागाला दिल्या आहेत. आता या चौकशीतही काय समोर येणार, हे अहवाल आल्यानंतरच कळणार आहे. 


बुरशीयुक्‍त शेवयांच्या प्रकरणानंतर असोदा येथे शेवया खाल्ल्याने मुलांना विषबाधा झाल्याचा प्रकार गंभीर आहे. यावरून माल जप्तीबाबत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून, ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 
- शिवाजी दिवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com