उमवि'स बहिणाबाई चौधरींचे नाव

उमवि'स बहिणाबाई चौधरींचे नाव

जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जिल्ह्यासह खानदेशवासियांनी सातत्याने मागणी, पाठपुरावा करत पुकारलेल्या लढ्याला अखेर आज यश आले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास ज्येष्ठ कवयित्री खानदेशकन्या बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात केली. ही घोषणा होताच जळगाव शहरासह बहिणाबाईंचे माहेर असलेल्या असोद्यात व जुन्यागावातील बहिणाबाईंच्या सासर असलेल्या वाड्यात जल्लोष करण्यात आला. 

गेल्या वीस वर्षांपासून विद्यापीठास बहिणाबाईंचे नाव द्यावे, अशी मागणी सातत्याने होत होती. विद्यार्थी संघटना, लोकप्रतिनिधी यासाठी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करीत होते. पाडळसे येथे नुकत्याच झालेल्या लेवा समाजाच्या अधिवेशनात माजीमंत्री एकनाथराव खडसेंच्या सूचनेनुसार यासंदर्भात ठरावही करण्यात आला होता. या एकत्रित प्रयत्नांना या घोषणेच्या माध्यमातून यश आले आहे. 

खानदेशाचे स्वतंत्र विद्यापीठ असावे यासाठी अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर सरकारने 1990मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना केली व राष्ट्रीय महामार्गावरील आयटीआयजवळील एका छोट्या इमारतीत विद्यापीठाचा कारभार सुरु झाला. त्यानंतर अल्पावधीत विद्यापीठाने शिक्षणक्षेत्रात चांगली कामगिरी करुन राज्यातच नव्हे तर देशात नावलौकिक प्राप्त केला. 

विद्यापीठाच्या नामांतराचा विषय 
बालकवी ठोंबरे, सानेगुरुजी, बहिणाबाई चौधरी यासारख्या साहित्यक्षेत्रातील थोरांची पार्श्‍वभूमी लाभलेल्या खानदेशाच्या भूमीत विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर 1995पासून विद्यापीठाच्या नामांतराचा विषय समोर आला. माजी नगराध्यक्ष स.ना. भालेराव यांनी त्यावेळी विद्यापीठास साने गुरुजींचे नाव द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र, सोबतच विविध संस्था, विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून बहिणाबाईंच्या नावासाठी आग्रह धरला जात होता. 

विद्यार्थी संघटनांचा लढा 
जळगावात मुविकोराज कोल्हे यांच्या नेतृत्वात काही विद्यार्थी संघटना यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत होत्या. कोल्हे यांनी दहा वर्षांपासून हा विषय सातत्याने लावून धरला. सुरवातीला आमदार-खासदारांना निवेदन देऊन त्यांचे या मागणीसाठी पाठिंबापत्र घेतले, या पत्रांसह निवेदन तयार करुन तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत भावना पोचविण्यात आल्या. यादरम्यान गणेशोत्सवात विविध मंडळांच्या ठिकाणी या मागणीचे फलक लावण्यात आले, विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलनही झाले. गेल्या विधानसभेच्या सभागृहात अमळनेरचे तत्कालीन आमदार साहेबराव पाटील यांनी या मागणीबाबत ठरावही मांडला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com