शब्द देतो.. एका वर्षात जळगावचा कायापालट करतो! : गिरीश महाजन

शब्द देतो.. एका वर्षात जळगावचा कायापालट करतो! : गिरीश महाजन

जळगाव : जळगाव शहर विकास आणि उद्योगातही मागे पडले आहे. त्याच जळगावचा विकास करून मला शहर नाशिक, औरंगाबादच्या बरोबरीत आणायचे आहे. त्यामुळे जळगावकरांनी भाजपला एकहाती सत्तेची फक्त एकच संधी द्यावी. आपण केवळ एका वर्षात शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखविणार आहोत. हा माझा शब्द आहे, आणि हेच माझे वचन आहे. अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 
जळगाव महापालिका निवडणूक भारतीय जनता पक्ष जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. स्वतः: महाजनही आज प्रचारात सहभागी झाले विविध भागात जाऊन त्यांनी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. निवडणूक होईपर्यंत आता प्रत्येक भागात जाऊन प्रचार करणार आहेत. शिवतीर्थ मैदानाजवळील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात "सकाळ'शी बोलताना त्यांनी निवडणुकीतील प्रचार मुद्याबाबत आणि जळगावच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा केली. 

प्रश्‍न : शिवसेनेच्या युतीचा प्रस्ताव तुम्ही का नाकारला? 
उत्तर :
युतीबाबत सुरेशदादा जैन यांनी प्रस्ताव दिला होता. आम्हीही तयार होतो, त्यांनी आम्हाला केवळ 27 जागा देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, नंतर आमच्याकडे अनेकांनी प्रवेश केला त्यामुळे आमच्याकडेच संख्या जास्त झाल्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. 

प्रश्‍न : भाजपच्या सत्ता काळातच जळगावचा विकास थांबला, अशी टीका होते? 
उत्तर
: आमची केवळ सोळा महिने सत्ता होती, त्यातही बहुमत नव्हते. आम्ही त्या काळात कोणतेही कर्ज घेतले नाही. जैन यांच्याकडे तर तब्बल तीस वर्षे सत्ता आहे. केवळ तीस वर्षे आणि सोळा महिन्याची बरोबरी कशी होऊ शकते? तुम्ही 30 वर्षांत शहर कर्जबाजारी करून ठेवले आहे. 

प्रश्‍न : झोपडीमुक्तीसाठी कर्ज घेतल्याचा जैनांच्या दाव्याबाबत काय? 
उत्तर
: "झोपडपट्‌टीमुक्त नव्हे तर कर्जयुक्त शहर' झालेले आहे. ज्या ठिकाणी घरकुले उभारली त्या जागाही यांनी अद्याप नावावर केलेल्या नाहीत. बेकायदा जागेवर घरकुल उभारले आहे. आणि घेतलेल्या कर्जाच्या फेडण्याचे नियोजन केले नाही. 

प्रश्‍न : चार वर्षात शासनाने सहकार्य केले नाही? 
उत्तर
: शासनाने कर्जमुक्तीसाठी प्रयत्न केले, 25 कोटी रुपये विकासासाठी दिले. परंतु त्यांना त्याचे नियोजन करता आलेले नाही. सत्ताधाऱ्यांच्या वादावादीत विकास ठप्प झाला. अकार्यक्षमतेचे खापर शासनावर फोडणे योग्य नाही. 

प्रश्‍न : कर्जफेडीची मुदत सांगा, असे जैन यांचे आवाहन आहे 
उत्तर
: वा रे वा! कर्ज यांनी करायचे आणि आम्हाला कर्जफेडीची मुदत मागायची? अहो, आम्ही कर्जमुक्त जळगाव शहर करणारच आहोत, असा शब्द आम्ही जळगावकरांना देत आहोत. 

प्रश्‍न : आम्ही कर्ज भरले आहे असा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे? 
उत्तर
: कर्ज घ्यायचे.. त्याचे व्याज थकवायचे. त्यानंतर नंतर ती रक्कम भरायची आम्ही कर्जफेड केली म्हणायची, असा कोणता व्यवहार आहे? घेतलेल्या कर्जाच्या मुद्दलाचा प्रश्‍न आहे. 

प्रश्‍न : केंद्रात व राज्यात आपली सत्ता मग कर्जमुक्ती का केली नाही? 
उत्तर
: होय, आमची केंद्रात व राज्यात सत्ता आहे, परंतु महापालिकेत आमची सत्ता नाही, आम्हाला कोणतेही अधिकार नाहीत. महापालिकेचे कोणतेही अधिकार आमच्या हातात नव्हते. त्यामुळे आम्ही काम करू शकत नव्हतो. 

प्रश्‍न : जळगावच्या विकासाची हमी काय? 
उत्तर
: जळगावकरांनी जैन यांना सत्तेत तब्बल तीस वर्षे दिली आहेत. तरीही शहर भकास आहे. आम्ही फक्त सत्तेची एक संधी मागत आहोत. एका वर्षात जळगावचा चेहरा- मोहरा बदलणार आहोत. विकास करू शकलो नाही, तर आम्ही विधानसभेत मते मागावयास येणार नाही, हा माझा शब्द आहे. हे वचन देताना आम्ही विधानसभाच डावावर लावली आहे. 

प्रश्‍न : गाळेप्रश्‍नाचं काय? 
उत्तर
: गाळेधारक गेल्या अनेक वर्षापासून त्याठिकाणी आहेत. त्यांना तेथून काढून लिलावाची प्रक्रिया करणे योग्य नाही, शासनाने नवीन नियम केल्यानुसार त्यांना मुदत वाढवून देत करार करण्यात येईल. 

प्रश्‍न : भाजपला किती जागा मिळणार? 
उत्तर
: भाजपवर जनतेचा विश्‍वास आहे, त्यामुळे राज्यात प्रत्येक निवडणुकीत भाजपला यश मिळाले आहे. जळगावकरही विश्‍वास व्यक्त करतील आम्हाला 50 पेक्षा अधिक जागा मिळतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com