residentional photo
residentional photo

हतनूर प्रकल्पात 34 टक्केच जलसाठा 

रावेर : कमी झालेला पावसाळा आणि सप्टेंबरनंतर तापी आणि पूर्णा नदीच्या प्रवाह बंद पडल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत हतनूर मध्यम प्रकल्पातील जलसाठा तब्बल अकरा टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. सध्या प्रकल्पात फक्त 34 टक्केच जलसाठा आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अडीच महिने बाकी असल्याने यंदा निम्म्या जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ सहन करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. 

100 गावाना पाणी पुरवठा 
हतनूर या मध्यम प्रकल्पातून रावेर, सावदा, यावल, भुसावळ, वरणगाव, भुसावळ रेल्वे, जळगाव औद्योगिक वसाहत, मलकापूर या शहारांसह जिल्ह्यातील सुमारे 100 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. 
यावर्षी हा प्रकल्प भरला मात्र प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्यावर सुद्धा तापी आणि पूर्णा नदीच्या पात्रातून सप्टेंबर, ऑक्‍टोबर पर्यंत पाणी वाहत येते आणि पाणी साठ्यात भर पडत जाते. यंदा हा 'येवा' लवकर बंद झाला. त्यामुळे प्रकल्पातील साठा आताच एक तृतीयांश झाला आहे.  रविवार सकाळी आठ वाजता प्रकल्पात 219:40 दशलक्ष घनमीटर जलसाठा होता. या प्रकल्पाच्या एकूण जलसाठ्याच्या 33.88 टक्के इतका आहे. मागील वर्षी 1 एप्रिल 2017 ला प्रकल्पात 248.25 दशलक्ष घनमीटर म्हणजे क्षमतेच्या 45.20 टक्के जलसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षीचा पाणी साठा 11 टक्‍क्‍यांनी कमी आहे. जलसाठा रोज अर्ध्या टक्‍क्‍याने कमी होत आहे. सुमारे दोन महिन्यात जिवंत पाणी साठा संपेल अशी शक्‍यता आहे. 

काटकसरीची गरज 
पावसाळा 7 जूनला सुरू होतो. प्रत्यक्षात या प्रकल्पात पाणी साठा किमान जूनच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात वाढतो. याचा अर्थ पावसाळ्यासाठी अजून तब्बल अडीच महिने बाकी आहेत. शिल्लक पाणी साठा काळजीपूर्वक, काटकसरीने वापरण्याची गरज आहे, अन्यथा निम्म्या जिल्ह्याला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्‍यता आहे. 
उन्हाळ्यामुळे 100 गावात पाण्याचा वापर वाढला आहे त्यामुळे यावर्षी हा जिवंत पाणी साठा तुलनेने लवकर संपण्याची चिन्हे आहेत. 

17 टक्के पाण्याचा वापर 
मागील महिन्यात याच काळात प्रकल्पात 51 टक्के पाणी साठा होता. महिनाभरात तो 34 टक्‍क्‍यांवर खाली आला आहे. याच वेगाने पाण्याचा वापर झाल्यास मे च्या मध्यात प्रकल्पातील जिवंत पाणी साठा संपण्याची चिन्हे आहेत. 

तीव्र टंचाईची शक्‍यता 
प्रकल्पातील जिवंत पाणीसाठा संपला तरीही या प्रकल्पात मोठमोठे खड्डे आहेत त्यात पाणी असतेच. त्यामुळे प्रकल्पाच्या वरच्या बाजूला फारशी पाणीटंचाई जाणवणार नाही मात्र ज्या ठिकाणी प्रकल्पातून पाणी सोडल्यावरच पुरवठा होतो तिथे तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. प्रकल्पाचे सर्व दरवाजे पूर्ण उघडल्यावर देखील प्रकल्पातून पाणी खालच्या नदीपात्रात पडत नसेल तर त्याला जिवंत पाणीसाठा संपला असे म्हणतात. या परिस्थितीत प्रकल्पातील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणीसाठा असतो, मात्र तो वापरणे अवघड असते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com