"राष्ट्रवादी'ला दाखवावी लागणार लोकसभेतच ताकद

"राष्ट्रवादी'ला दाखवावी लागणार लोकसभेतच ताकद

जळगाव : सहा आमदार, जिल्हा बॅंकेवर वर्चस्व, पालिकांवर पक्षाचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेत अध्यक्ष, एक खासदार अशी मजबूत स्थिती एकेकाळी जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची होती. मात्र हे सर्वच आता सांगण्यासाठीच राहिले आहे. आजच्या स्थितीत पक्षाचा जिल्ह्यात एकच आमदार आहे. सहकार क्षेत्रातही फारसे वर्चस्व राहिले नाही. मात्र जिल्ह्यात पक्षाला हेच पूर्ववैभव मिळू शकते, आता पदभार बदलला आहे, पण केवळ तेवढ्यानेच भागणार नाही तर संघटना मजबूत बांधणीची गरज असून त्याच बळावर लोकसभेत दोन पैकी एकतरी खासदार निवडून आणून ताकद दाखवावी लागणार आहे. तरच पक्षाचा विधानसभेत मोठी आशा असणार आहे. 

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस क्रमांक एकचा पक्ष होता, मात्र गेल्या काही वर्षात पक्षाची मोठ्या प्रमाणात पीछेहाट झालेली आहे. भारतीय जनता पक्षाची "मोदी'लाट त्याला एक कारण आहेच. लोकसभा व विधानसभेनंतरच्या स्थानिक झालेल्या निवडणुकीतही पक्ष फारसा यश मिळवू शकलेला नाही. अर्थात जो पक्ष केंद्रांत व राज्यात सत्तेवर असतो त्याचेच बळ स्थानिक निवडणुकीत असते असे नेहमीच चित्र असते. विरोधी पक्ष असलेल्या पक्षाचे काही उमेदवार तरी निवडून आले पाहिजेत. परंतु तसे चित्र गेल्या स्थानिक निवडणुकीत दिसून आले नाही. जामनेर नगरपालिका आणि जळगाव महापालिका निवडणुकीत तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. तर मुक्ताईनगर नगरपरिषदेतही पक्षाची दाणादाणच झालेली आहे. भुसावळ, पाचोरा, धरणगाव, पारोळा नगरपालिका निवडणुकीतही पक्ष अपयशीच ठरला आहे. तर जिल्हा परिषद निवडणुकीतही पक्षाची कामगिरी फारशी चांगली नाही. जिल्ह्यात दोन्ही लोकसभेच्या जागा आघाडीच्या वाटपात पक्षाकडेच आहेत. परंतु अद्यापही पक्षातर्फे उमेदवारांचे नाव दृष्टिपथात नाही. 
जिल्ह्यात पक्ष नेतृत्वाची यादी काढली तर ती मोठी आहे. कागदावर अत्यंत दमदार वाटत आहे. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत पक्ष कमजोर का पडतो? याचाच विचार करण्याची खरी गरज आहे. पक्षांतर्गत नाहीत असे म्हणणे चुकीचे ठरेल आणि ते प्रत्येक पक्षात असतात त्याप्रमाणे राष्ट्रवादीतही आहेत. परंतु या वादाचा परिणाम थेट निवडणुकांत दिसून येतो. निवडणुकांनंतर मात्र पक्षाचे नेते कार्यालयात चिंतन करीत बसतात आणि वाद मिटविण्याचा प्रयत्न करतात मग हेच अगोदर का केले जात नाही हाच खरा प्रश्‍न आहे? 
"भाकरी आणि घोडा फिरविलाच पाहिजे' यानुसार पक्षाच्या पदातही बदल केले पाहिजे या नुसार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासह इतर पदे बदलली आहेत. जिल्हाध्यक्षपदासाठी ऍड. रवींद्र पाटील हे जुने नेतृत्व पुन्हा दिले आहे. जुने वैभव आणण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे, मात्र त्यांना यासाठी प्रथम संघटना मजबूत बांधणी करावी लागणार आहे. पक्षाची गाठ संघटन मजबूत असलेल्या भारतीय जनता पक्षाशी असणार आहे हे विसरून चालणार नाही. शिवाय पक्षाला आपली ताकद आगामी लोकसभा निवडणुकीतच दाखवावी लागणार आहे. जर पक्षाला या निवडणुकीत यश मिळाले नाही, तर विधानसभा निवडणुकीत मोठी कठीण परिस्थिती असणार आहे. पक्षाचे राज्यस्तरावरील नेतृत्वाकडून लक्ष असण्याची गरज आहे. भडगावच्या मेळाव्यात वरिष्ठ नेतृत्वाकडून काय संदेश मिळणार याकडेच आता कार्यकर्त्याचे लक्ष आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com