ओपिनियन मेकर : औद्योगिक विकासाशिवाय सर्वांगीण प्रगती अशक्‍य - प्रा. नंदलाल गादिया

nandalal gadiya
nandalal gadiya

जळगाव शहरातील समस्या नवीन नाहीत. इतर शहरांप्रमाणेच त्या या शहरातही आहेत. कदाचित आपल्या शहरात त्या अधिक असतील, एवढेच. मात्र, या समस्या सोडवून शहराची एकूणच प्रगती साधायची असेल तर येथील नागरी सुविधांच्या पूर्ततेसह औद्योगिक विकासही होणे आवश्‍यक आहे. महापालिकेची त्यातील भूमिका उद्योगांना पूरक अशीच असली पाहिजे. पालिका प्रशासनाने या ठिकाणी तसे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. 
 
सा धारण दोन दशकांपूर्वी जळगावातील औद्योगिक वसाहतीची स्थिती चांगली होती. अनेक लहान-मोठे उद्योग "एमआयडीसी'त स्थायिक होते, ते चांगले तेजीतही होते. जळगाव शहरातीलच नव्हे; तर आजूबाजूच्या जवळपास 15-20 किलोमीटर क्षेत्रातील खेड्यांमधून कामगार "एमआयडीसी'त येत. दिवसेंदिवस उद्योगांची अवस्था बिकट होऊ लागली. पुरेशा नागरी सुविधा या भागात उपलब्ध न झाल्याने काही उद्योग बंद पडू लागले, तर काहींचे स्थलांतर झाले. त्याचा परिणाम एकूणच शहराच्या प्रगतीवर झाल्याचे दिसून येईल. 
पालिका प्रशासनाचे उद्योगपूरक धोरण नसल्याने ही अवस्था झाल्याचे मानले जाते. ज्या शहरातील नागरिकांच्या हाताला काम असते, त्या शहराची प्रगती झपाट्याने होते, असा अनुभव आहे. जळगाव शहरात गेल्या काही वर्षांमध्ये याउलट स्थिती निर्माण झाली. हाताला काम नसल्याने शहरातून अनेकजण स्थलांतर करत आहेत. ही स्थिती बदलायची असेल तर औद्योगिक विकासाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी उद्योगांना सवलती देऊन, "एमआयडीसी'त पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. नवीन उद्योग येतील, असे वातावरण या ठिकाणी तयार व्हायला हवेत. उद्योगांचा विकास झाला तर शहराचे चित्र बदलू शकेल. 
नागरी सुविधांबाबतही शहराची अवस्था ठीक नाही. महापालिकेवरील कोट्यवधींचे कर्ज, उत्पन्नाचे आटलेले स्त्रोत त्यामुळे बिघडलेली आर्थिक घडी या सर्व बाबींचा परिणाम सुविधांवर झाला आहे. त्यासाठी पालिकेच्या कामकाजात शिस्त आली पाहिजे, सोबतच आर्थिक व प्रशासकीय शिस्तही महत्त्वाची आहे. पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या प्रत्येक पैशाचे नियोजन योग्य पद्धतीने व्हायला हवे. 
नागरी सुविधांसोबतच शहरातील विविध महाविद्यालये, क्‍लासेसच्या ठिकाणी मुला-मुलींची मोठी गर्दी होते. काही भागात तर उपद्रवी तरुण जमा होतात, त्यातून त्या परिसरातील वातावरण दूषित होते. अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असून त्यामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्‍यात येऊन गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. पालिकेशी त्याचा थेट संबंध नसला तरी पालिका प्रशासन व पोलिस विभागाने समन्वय साधून अशा ठिकाणांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. सायंकाळी, रात्रीच्या सुमारास अशा "ब्लॅक स्पॉट'वरील पथदिवे नेहमीच बंद असतात, त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. स्थानिक नगरसेवक हा त्याच भागाचा प्रतिनिधी असतो, त्यांनीही अशा भागांवर लक्ष ठेवून समाजकंटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, जेणेकरुन मुलींच्या छेडखानीचे व अन्य गंभीर प्रकार घडणार नाहीत. सर्वांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून शहरासाठी काम केल्यास निश्‍चितच चांगले चित्र निर्माण होऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com