हागणदारीमुक्‍तीचे कागदी घोडे! 

हागणदारीमुक्‍तीचे कागदी घोडे! 

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव हागणदारीमुक्‍त करण्यासाठी वैयक्‍तिक शौचालय उभारणीचे काम करण्यात आले. "बेसलाईन सर्व्हे'नुसार जिल्ह्यासाठी मिळालेले उद्दिष्टपूर्तीचे काम खऱ्या अर्थाने यंदा एप्रिलमध्ये पूर्ण झाले आहे. गाव हागणदारीमुक्‍तीचे केवळ कागदी घोडे नाचविले जात असून, प्रत्यक्षात उघड्यावर शौचास जात असल्याने गावाच्या वेशीवरच दुर्गंधी पसरलेली अनुभवण्यास मिळत आहे. 
देश ऑक्‍टोबर 2019 पर्यंत स्वच्छ करण्याच्या हेतूने 2 ऑक्‍टोबर 2014 पासून "स्वच्छ भारत अभियान' राबविण्यास सुरवात झाली. याच धर्तीवर राज्यातील शहरी भागात "स्वच्छ महाराष्ट्र अभियाना'ची 15 मे 2015 पासून अंमलबजावणी झाली. यामध्ये सार्वजनिक शौचालये, समूह शौचालय तसेच वैयक्‍तिक लाभार्थ्यांसाठी शौचालये बांधण्यास सुरवात करण्यात आली. मुख्य म्हणजे शासनाकडून 2012 मध्ये बेसलाईन सर्व्हे करून ज्यांच्याकडे शौचालय नाही, त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. अशा वैयक्‍तिक लाभार्थ्यांसाठी 12 हजार रुपये अनुदान दिले जाते. सरकारच्या "स्वच्छ भारत मिशन' या अंतर्गत कामाला सुरवात झाली. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छ भारत मिशन उपक्रम राबविण्यात आला. 

एप्रिलमध्ये उद्दिष्टपूर्तीनंतर हागणदारीमुक्‍त 
गाव हागणदारीमुक्‍त करण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या बेसलाईन सर्व्हेनुसार वैयक्‍तिक शौचालय नसलेल्यांचा समावेश करण्यात आला होता. या बेसलाईन सर्व्हेनुसार जिल्ह्यात 2 लाख 71 हजार 954 वैयक्‍तिक शौचालय उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट साध्य करण्याचे काम जिल्हा परिषदेकडून एप्रिल 2018 मध्ये पूर्ण झाले. बेसलाईन सर्व्हेमध्ये असलेल्यांकडे शौचालय उभारणी झाल्यानंतर जिल्हा पूर्णपणे हागणदारीमुक्‍त झाल्याची घोषणा करण्यात आली. 

गाववेशीपासूनच दुर्गंधी 
जिल्हा हागणदारीमुक्‍त झाल्याची नोंद शासन दरबारी कागदोपत्री करण्यात आली आहे. यामुळे कागदोपत्री उद्दिष्टपूर्तीने जिल्ह्याचे नाव करून घेतले, तरी प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील चित्र वेगळेच पाहावयास मिळत आहे. खेडेगावातच नाही, तर शहरी भागात देखील उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूने शौचास अनेकजण बसतात. यामुळे गावाच्या वेशीपासूनच दुर्गंधी येत असते. म्हणजेच जिल्हा परिषद प्रशासनाकडून हागणदारीमुक्‍तीची कागदोपत्री घोषणा झाली असली, तरी आज देखील गाव पूर्णपणे हागणदारीमुक्‍त झालेले नाही, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. 

शौचालयांमध्ये सरपण अन्‌ भंगार 
वैयक्‍तिक शौचालय उभारणीसाठी शासनाकडून लाभार्थ्यांना 12 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. अनेकांनी हे अनुदान लाटण्यासाठी नुसत्याच शौचालयांच्या चार भिंती उभारल्या. कागदोपत्री शौचालय उभारणीचे काम दाखवून शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्यात आले. असे अनेकजण असून, शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास जात असतात. तर बांधलेल्या शौचालयांचा वापर लाकडांचे सरपण व भंगार सामान ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. 
 
72 हजार कुटुंब अजूनही शौचालयाविना 
शासनाकडून 2012 मध्ये झालेल्या बेसलाईन सर्व्हेमध्ये ज्यांच्याकडे वैयक्‍तिक शौचालय नाही, अशा कुटुंबांची नावे समाविष्ट करून त्यांना अनुदान देऊन शौचालय बांधकाम करून देण्यात आले. परंतु, जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात पुन्हा सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये जिल्ह्यात आजही 72 हजार कुटुंबांकडे वैयक्‍तिक शौचालय नसल्याची बाब समोर आली आहे. त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच 45 हजार सार्वजनिक शौचालय हे वैयक्‍तिक शौचालयांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आले असून, यातील पाच हजार शौचालय बांधकाम पूर्ण झाले आहेत. 
 
बेसलाईन सर्व्हेप्रमाणे जिल्ह्यात शौचालय उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण होऊन जिल्हा हागणदारीमुक्‍त झाला. परंतु, शौचालय बांधल्यानंतर त्याचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले असून, यासाठी जिल्ह्यात कुटुंब संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच बेसलाईन सर्व्हेमध्ये नाव नाही आणि शौचालय नसलेल्या 72 हजार कुटुंबांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 
- राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद. 

- 72 हजार कुटुंब शौचालयाविना. 
- कागदावर शंभर टक्‍के उद्दिष्टपूर्ती. 
- 45 हजार सार्वजनिक शौचालय वैयक्‍तिकमध्ये समाविष्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com