सुकाणू समितीकडून महामार्गावर अर्धा तास 'रास्ता रोको'

सुकाणू समितीकडून महामार्गावर अर्धा तास 'रास्ता रोको'

जळगाव : राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा तिन वेळेस केली आणि तिनही वेळेस वेगवेगळे निकष लावले. या खोटारड्या सरकारमुळे शेतकऱ्यांना तातडीचे दहा हजारांचे कर्ज देण्याची घोषणानंतरही अद्यापपर्यंत पदरात काहीही पडलेले नाही. कर्जमाफी देण्यात शासन अपयशी ठरली असून, या विरोधात शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने आज महामार्गावर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

बांभोरीजवळील गिरणा नदी पुलाजवळ आज (ता.14) दुपारी दोनला रास्कारोको आंदोलनाला सुरवात करण्यात आली. सुकाणू समितीचे सदस्य एस. बी. पाटील, राष्ट्रवादीचे विनोद देशमुख, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, बी. जी. पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार, प्रा. डी. डी. बच्छाव, संजू सोनवणे आदींची उपस्थिती होती. 

अर्धा तास चालले आंदोलन 
बांभोरी पुलाजवळ दुपारी दोनला सुरू झालेले रास्तारोको आंदोलन अडीच वाजेपर्यंत चालले. महामार्गावर बसून कर्जमाफीत अपयशी झालेल्या शासनाच्या विरोधात सुकाणू समितीतील पदाधिकारी व शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या. अर्धा तास झालेल्या रास्ता रोकोमुळे जळगावकडे खोटेनगर तर पाळधीकडे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या. आंदोलन संपल्यानंतर महामार्गावरील खोळंबलेली वाहतुक सुरळीत होण्यास एक तासाचा कालावधी लागला. 

आंदोलन आणखी तीव्र करणार : सुकाणू समिती 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने घोषणा करून देखील त्याचा लाभ शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. शिवाय शेतकऱ्यांना तातडीने दहा हजारांचे कर्ज देण्याची घोषणा देखील वाऱ्यात विरली असून, सरकारने तिनदा घोषणा केली आणि तिनहीवेळेस खोटे बोलून फसवणूक केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आता रस्त्यावर नव्हे, तर सर्व आमदारांच्या निवासस्थानी जावून उपोषण करून आंदोलन आणखी तिव्र करण्याचा इशारा सुकाणू समितीने दिला. तसेच 3 ऑक्‍टोंबर काही निर्णय झाल्यास प्रत्येक बॅंकेत जावून बसणार असल्याचेही समितीतर्फे यावेळी सांगण्यात आले. 

आम्हीही रस्त्यावर बसलोय अन्‌ आताही शेतकऱ्यांसाठीच आलो : मंत्री गुलाबराव पाटील 
शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकरी सुकाणू समितीतर्फे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या ठिकाणी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील उपस्थिती लावली. यावेळी सुकाणू समितीने मंत्री पाटील यांना आंदोलनात बसण्यास सांगितले, मात्र पाटील यांनी बसण्याचे टाळले. यावेळी बोलताना ते म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी शिवसेनेकडून आंदोलन करत दोन वर्षांपुर्वी आम्ही देखील रस्त्यावर बसलोय. आज शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असून, आपले पक्ष वेगळे असले तरी शेती- माती एक असल्याने आंदोलनाच्या ठिकाणी आलो. दहा हजार रूपयांच्या मदतीबाबत येणाऱ्या अडचणी तसेच कर्जमाफीबाबत तुमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचे आश्‍वासन मंत्री पाटील यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com