विषारी औषध सेवन केलेल्या महिलेचा मृत्यु 

residenational photo
residenational photo

नाशिक : विषारी औषध सेवन केलेल्या महिलेस उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.  त्यानंतर त्यांना लावण्यात आलेल्या व्हेंटिलेटरमध्ये झुरळ आढळून आले. त्यामुळेच महिलेचा मृत्यु झाल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. दरम्यान, गंभीर प्रकृती असलेल्या महिलेला व्हेंटिलेटर लावण्यात आल्यानंतर तासाभराने तिचा मृत्यु झाला. पोलिसी प्रक्रिया पार पडेपर्यंतच्या कालावधीमध्ये बंद असलेल्या व्हेंटिलेटरमध्ये झुरळ आले असावे, असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. 

अंजली शंकर बैरागी (42, चतुर संप्रदाय आखाडा, मालेगाव स्टॅंड, पंचवटी) असे मृत महिलेचे नाव आहे. अंजली बैरागी यांनी गेल्या 16 तारखेला अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर 17 तारखेला आडगावच्या मविप्र संचलित डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अंजली बैरागी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. दरम्यान, रविवारपासून महिलेची प्रकृती सातत्याने खालावत गेली. सोमवारी (ता.23) रात्री आठच्या सुमारास प्रकृती गंभीर झाली. त्यांना श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तातडीने व्हेंटिलेंटर लावले. मात्र रात्री साडेनऊ-पावणे दहाच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला. महिलेने विषारी औषध घेत आत्महत्त्येची घटना असल्याने रुग्णालय प्रशासनाकडून आडगाव पोलीसांना माहिती कळविली. 
 झुरळ व्हेटींलेटरमध्ये गेल्याची घटना नातलगांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याची तक्रार रुग्णालयाकडे केली आणि गोंधळ घालत त्यामुळे महिलेचा मृत्यु झाल्याचा आरोप केला. आडगाव पोलीस आल्यानंतर त्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी नातलगांची समजूत घातली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला, त्यानंतरच मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी आडगाव पोलिसात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 
 
विषारी औषध सेवन केल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेची प्रकृती चिंताजनकच होती. तरीही रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी (ता.23) प्रकृती बिघडली. व्हेटिंलेटर लावल्यानंतरही महिलेचा मृत्यु झाला. व्हेंटिलेटरचे फिल्टर व ट्युबिंग एकदा वापरल्यानंतर पुन्हा वापरता येत नाही. नवीन फिल्टर व ट्युबिंग हे पॅकबंद असल्याने त्यात कोणताही जीवजंतू जाण्याची सुतराम शक्‍यता नाही. रुग्णाला व्हेंटिलेटर सुरू असताना त्यातील हवेच्या दाबासमोर झुरळ राहू शकणार नाही. त्यामुळे रुग्ण महिलेचा मृत्यु झाल्यानंतर व्हेंटिलेटर बंद केले, त्यानंतरच ते झुरळ आतमध्ये आले असण्याचीच अधिक शक्‍यता आहे. 
- डॉ. मृणाल पाटील, अधिष्ठाता, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, आडगाव
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com