तृतीय वर्ष विज्ञानच्या सर्वच गुणपत्रकांत चुका 

तृतीय वर्ष विज्ञानच्या सर्वच गुणपत्रकांत चुका 

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष विज्ञान या अभ्यासक्रमाचा सुरवातीला ऑनलाइन निकाल जाहीर झाला. यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुणपत्रके मिळून जवळपास दीड महिना उलटला असताना या वर्गाच्या सर्वच गुणपत्रकांत "सीजीपीए'च्या गुणांमध्ये चूक झाली असल्याचे लक्षात आले आहे. यामुळे आपल्याला नक्की किती गुण मिळाले, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांनी गुणपत्रक बदलून देण्याची मागणी विद्यापीठाकडे केली आहे. 

उमवितर्फे एप्रिल 2018 मध्ये टी. वाय. बी.एस्सीची परीक्षा घेण्यात आली होती. यानंतर विद्यार्थ्यांना दीड महिन्यांपूर्वी गुणपत्रकाचे वाटप झाले. यानंतर विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अर्ज केले. यात एम.एस्सी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणपत्रकाच्या आधारे प्रवेश अर्ज केले होते. यानंतर विद्यापीठातर्फे "प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट' जाहीर करण्यात आली असता त्यात प्रत्यक्ष गुणपत्रकातील "ग्रॅण्ड सीजीपीए' व मेरिट लिस्टच्या "ग्रॅण्ड सीजीपीए'च्या गुणात तफावत दिसून आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या प्रकाराबाबत विद्यापीठ परीक्षा विभाग व कुलगुरूंशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. 

सॉफ्टवेअरमुळे घोळ 
गुणपत्रकातील घोळाबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला विचारणा केली असता, सॉफ्टवेअरमधील चुकीमुळे हा घोळ झाल्याचे सांगण्यात आले. पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांचे प्रिन्सिपल विषयाची "सीजीपीए' गुणांनुसार मेरिट लिस्ट तयार केली जाते. परंतु जर दोन विद्यार्थ्यांच्या प्रिन्सिपल विषयाचे "सीजीपीए' गुण सारखे असल्यास "ग्रॅण्ड सीजीपीए' गुण पाहून मेरिट लिस्ट तयार केली जाते. मात्र, याच यादीत तफावत असल्याने मेरिट लिस्ट बदलण्याची शक्‍यता आहे. 

गुणपत्रक बदलून देणार का ? 
ज्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर प्रवेशासाठी अर्ज केला नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अन्य विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी अर्ज केला आहे, त्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे बदल कसे होतील? त्या सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रक बदलून दिले जाईल का? गुणपत्रक बदलायचे असल्यास सुधारित गुणपत्रक कधी मिळणार? विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार? दोषींवर कारवाई होणार का? यांसारखे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले आहेत. कुलगुरू पी. पी. पाटील यांनी परीक्षा विभागात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यापीठ सिनेट सदस्यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com