नंदुरबार - प्रेमविवाहाच्या रागातून एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील करजकुपा गावात घडली असून, पोलिसांनी या प्रकारात बहिष्कार घालणाऱ्या लेवा पाटीदार गुजर समाजाच्या बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धनंजय पाटील याने गावातील एकाच गोत्रातील मुलीशी प्रेमविवाह केल्याने त्याच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याची ही फिर्याद आहे.
या प्रकरणात बुद्धर गोपाळ पाटील, दिलीप धीरज पाटील, नरेंद्र राजाराम पाटील, दिलीप भटू पाटील, दामू पुनाजी पाटील, दशरथ नरोत्तम चौधरी, घनश्याम वेडू पाटील, रमेश वेडू पाटील, डाया उद्धव पाटील, वसंत शंकर चौधरी, नरेंद्र तुकाराम चौधरी, सखाराम गोविंद पाटील हे बारा जण संशयित आहेत. धनंजय पाटील यास समाजातील या मंडळींनी सांस्कृतिक कार्यक्रम व सुखदुःखाच्या घटनांतून बहिष्कृत केले. आम्ही तुम्हाला शेती करून देणार नाही व तुमच्या शेतात कोणत्याही मजुराला येऊ देणार नाहीत. शेतातील पीक कापून टाकू. शिवाय तुम्ही आमच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला गेले, तर संपूर्ण कुटुंबाला ठार मारून जंगलात फेकून देऊ, अशी धमकीही त्यांनी दिली.
|