कृषी उत्पादनांच्या निर्यातीत २.७० टक्के वृद्धी

कृषी उत्पादनांच्या निर्यातीत २.७० टक्के वृद्धी

नाशिक - फुले, कांदा, ताजा भाजीपाला, फळे, डाळी, मांस, अन्नधान्य या प्रमुख कृषी उत्पादनांची २०१५-१६ मध्ये एक लाख सहा हजार कोटींची निर्यात झाली होती. त्या तुलनेत देशातून गेल्या वर्षी २.७० टक्के अधिक म्हणजेच, एक लाख आठ हजार ८६७ कोटींची झाली. पण २०१४-१५ मध्ये एक लाख ३१ हजार ३३३ कोटींची निर्यात झाली होती. ही निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. ‘अपेडा’च्या तीन वर्षांतील निर्यातीच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे.

शेतमालाच्या घसरत चाललेल्या भावाच्या पार्श्‍वभूमीवर निर्यातवृद्धीला चालना देण्याची आवश्‍यकता तज्ज्ञ सातत्याने अधोरेखित करत आहेत. त्याच अनुषंगाने कृषीच्या प्रमुख उत्पादनांच्या निर्यातीची स्थिती बरीच बोलकी असल्याचे मानले जात आहे. निर्यातीत काही आशादायक स्थिती पाहावयास मिळत आहे. ती म्हणजे, फुले, आंबा, द्राक्ष, इतर ताजी फळे आणि कांद्याच्या निर्यातीचा आलेख उंचावला आहे. फुलांची २०१४-१५ मध्ये ४६०, २०१५-१६ मध्ये ४७९, गेल्या वर्षी ५४८ कोटींची, तर कांद्याची २०१४-१५ मध्ये दोन हजार ३००, २०१५-१६ मध्ये दोन हजार ७४७, गेल्या वर्षी तीन हजार १०६ कोटींची, आंब्याची २०१४-१५ मध्ये ३०२, २०१५-१६ मध्ये ३१७, गेल्या वर्षी ४४५ कोटींची, द्राक्षाची २०१४-१५ मध्ये एक हजार ८६, २०१५-१६ मध्ये एक हजार ५५१, गेल्या वर्षी दोन हजार ८८ कोटींची, इतर ताजी फळांची २०१४- १५ मध्ये एक हजार २४५, २०१५-१६ मध्ये एक हजार ५३८, गेल्या वर्षी एक हजार ८५८ कोटींची निर्यात झाली आहे. ताज्या भाजीपाल्याच्या निर्यातीत चढउतार राहिला आहे. २०१४-१५ मध्ये दोन हजार ४०२ कोटींची, तर २०१५-१६ मध्ये दोन हजार ११९ कोटींची अन्‌ गेल्या वर्षी दोन हजार ८१५ कोटींचा ताजा भाजीपाला निर्यात झाला आहे. या भाजीपाल्याची २०१४-१५ मध्ये ८४७, २०१५-१६ मध्ये ९१४ आणि गतवर्षी एक हजार ८८ कोटींची निर्यात झाली.

अन्नधान्यात निराशाजनक परिस्थिती
मांस, कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन, मध, अंडी अशा उत्पादनांच्या निर्यातीचा आलेख घसरणीला लागला आहे. २०१४-१५ मध्ये ३३ हजार १२८ कोटींची प्राणिजन्य उत्पादनांची निर्यात झाली होती. २०१५-१६ मध्ये ३० हजार १३७, तर गेल्या वर्षी २९ हजार ५३२ कोटींच्या निर्यातीवर समाधान मानावे लागले आहे. बासमती व इतर तांदूळ, गहू, मका आणि इतर अन्नधान्याची २०१४-१५ मध्ये ५८ हजार २७९ कोटींची, २०१५-१६ मध्ये ४० हजार ४३३ कोटींची निर्यात झाली. या तुलनेत गेल्या वर्षी ०.४७ टक्‍क्‍यांनी वाढून ४० हजार ६२४ कोटींपर्यंत पोचली. बासमतीऐवजी इतर तांदळाची निर्यात २०१५-१६ च्या तुलनेत गेल्या वर्षी १३.३३ टक्‍क्‍यांनी वाढली असली, तरीही इतर अन्नधान्याच्या निर्यात घसरली. गव्हाची २०१४-१५ मध्ये चार हजार ९९१, २०१५-१६ मध्ये ९७८, गेल्या वर्षी ४४८ कोटींची आणि मक्‍याची २०१४-१५ मध्ये चार हजार ३७, २०१५-१६ मध्ये एक हजार ८९, गेल्या वर्षी एक हजार ३० कोटींची निर्यात झाली. 

कतारमधील निर्यातीत १५ टक्‍क्‍यांनी वाढ
ताजी फळे, भाजीपाल्याची कतारमधील निर्यात दोन आठवड्यांत १५ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहारिनने गेल्या महिन्यात आर्थिक निर्बंध घातले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारत-कतारमधील व्यापाराला चालना देण्यात येत आहे. भारत-कतार एक्‍स्प्रेस सर्व्हिस त्यासाठी नव्याने स्थापन झाली असून, त्या माध्यमातून भारतातील ताजी फळे, भाजीपाला निर्यातीला प्रोत्साहन मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com