‘राष्ट्रवादी’चा महापालिकेवर जवाब दो मोर्चा

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महापालिकेवर शुक्रवारी काढण्यात आलेल्या जवाब दो मोर्चात सहभागी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक गजानन शेलार, अर्जुन टिळे, अंबादास
नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महापालिकेवर शुक्रवारी काढण्यात आलेल्या जवाब दो मोर्चात सहभागी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक गजानन शेलार, अर्जुन टिळे, अंबादास

नाशिक - शहरातील विविध प्रश्‍नांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आज महापालिका मुख्यालयावर जवाब दो मोर्चा काढण्यात आला. प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. गोदावरी व उपनद्यांचे प्रदूषण दूर करावे, घरकुल योजनेंतर्गत घरे मिळावीत, अस्वच्छता दूर करावी आदी महत्त्वाच्या मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या.

बी. डी. भालेकर मैदानावरून दुपारी बाराच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाली. दोन ते अडीच हजार कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. शालिमार चौक, शिवाजी रोड, सीबीएस, शरणपूर रोडमार्गे महापालिका मुख्यालयावर मोर्चा निघाला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महापालिकेचे गटनेते गजानन शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे आदींनी महापालिकेसंदर्भात तक्रारींचा पाढा वाचला.

भाजपने ध्येयनामा जाहीर केला. त्यात उड्डाणपूल, स्वतंत्र पार्किंग, शहर बससेवा, पर्यटनस्थळे विकास, क्रीडा प्रबोधिनी, आयटी हब, रुग्णालये, गोदावरी प्रदूषणमुक्त, वैद्यकीय महविद्यालयांचे आश्‍वासन दिले; परंतु त्यातील एकही आश्‍वासन अद्याप पूर्ण झाले नाही. उलट पार्किंगच्या नावाखाली ‘एआर’अंतर्गत इमारती विकसित करून घोटाळा केल्याचा आरोप रंजन ठाकरे यांनी केला. शहर बससेवा अद्याप सुरळीत नाही. मैदानांवर गवत उगले आहे. गोदावरी अद्याप प्रदूषित आहे. महापालिकेत रिक्त जागांची संख्या वाढत आहे. महापालिकेचा कारभार सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. 

स्मार्टसिटीमध्ये नाशिकचा समावेश करण्यात आला असला, तरी स्मार्ट कामे तर सोडाच; परंतु मूलभूत कामेदेखील होत नसल्याचा आरोप युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केला. ठेकेदारांची भलावण करण्यात भाजपला रस असल्याचा आरोप महापालिकेतील गटनेते गजानन शेलार यांनी केला. या वेळी राष्ट्रवादीचे नानासाहेब महाले, अर्जुन टिळे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, प्रेरणा बलकवडे, अनिता भामरे, कविता कर्डक, नगरसेवक शोभा साबळे, सुषमा पगारे, समिना मेमन, माजी नगरसेवक शोभा आवारे, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, बाळासाहेब कर्डक, नंदन भास्करे, अनिल जोंधळे, सुरेखा निमसे, रंजना गांगुर्डे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com