मांजरपाड्याला निधी हे निम्मेच समाधान ! 

 मांजरपाड्याला निधी हे निम्मेच समाधान ! 

नाशिक - ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पातून मांजरपाडा वळण योजनांसाठी वाढीव 289 कोटींना राज्य सरकारने मान्यता दिली खरी; पण सर्वेक्षण, आराखड्यासह सादर करण्यात आलेला मांजरपाडा-2 प्रकल्पाच्या मान्यतेची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. त्यामुळे हा निधी म्हणजे निम्मेच समाधान ठरले आहे. नवीन प्रकल्प घेऊ नये, या धोरणात योजना अडकल्या आहेत. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांच्या माहितीनुसार योजनांच्या मान्यतेसाठी राज्यपाल कार्यालयाला विनंती करण्यात आली आहे. 

पश्‍चिम वाहिन्यांचे वाहून जाणारे पाणी प्रवाही पद्धतीने गिरणा खोऱ्यात वळवणे शक्‍य आहे. खास बाब म्हणून मांजरपाडा-2 प्रकल्प आणि योजनांना मान्यता मिळावी, असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यासाठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडण्यात आले आहे. वरिष्ठ अभियंत्यांच्या म्हणण्यानुसार 0.600 टीएमसीहून अधिक आणि स्थानिक गरजांसाठी 0.150 टीएमसीहून अधिक पाण्याचा विनियोग करता येणार आहे. मध्यंतरी मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये नारपारमधून प्रवाही पद्धतीने 15 टीएमसी पाण्यापैकी 12 टीएमसी पाणी गिरणा आणि तीन टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती देण्यात आली होती. 

तात्पुरत्या संचयासाठी उपयोग 
मांजरपाडा-2 प्रकल्पाला आताच्या प्रचलित धोरणानुसार मान्यता मिळेल की नाही, याबद्दलची सांशकता आहे. त्याचवेळी पार-तापी-नर्मदा नदी जोड प्रकल्पामध्ये या प्रकल्पाचा समावेश होण्याची शक्‍यता वरिष्ठ अभियंत्यांना वाटते आहे. त्यांच्या माहितीनुसार धरणाचा उपयोग नदी जोड प्रकल्पातील पाणी तात्पुरत्या स्वरूपात साठवून ते पुढे गिरणा खोऱ्यात देण्यासाठी होणार आहे. ही सारी परिस्थिती पाहिली असता, मांजरपाडा-2 प्रकल्प आणि वळण योजनांविषयीच्या अपेक्षा अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होते. 

पालखेड, पुणेगाव, करंजवण, वाघाड, तिसगाव, ओझरखेड धरणांचा समावेश असलेल्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील मांजरपाडा आणि वळण योजनांमधून दोन टीएमसीच्या आसपास पाणी उपलब्ध होणार आहे. त्यासंबंधीचे नेमके चित्र सरकारच्या आताच्या वाढीव 289 कोटींच्या मान्यतेच्या माहितीतून स्पष्ट होणार आहे. मांजरपाडा वळण योजनेंतर्गतच्या दुसऱ्या सुधारित प्रशासकीय योजनेतील वाघाड- करंजवण जोडबोगदा, स्वतंत्र अंबड आणि चिमणपाडा वळण योजना राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशीअंती वगळण्यात आल्या आहेत. त्यातून किती पाणी कमी होणार आहे, याचीही माहिती समजण्यास मदत होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com