ग्रामसभेत केला ठराव ; अनावश्यक खर्चाला बसणार आळा
नाशिक - आधीच शेती संकटात सापडलेली असताना अनेक पिकांत तोट्याशीच सामना करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यातच विवाहसमारंभातील अनेक चुकीच्या प्रथांमुळे शेतकरी अधिकच मेटाकुटीस येतो. या पार्श्वभूमीवर गिरणारे येथे बुधवारी झालेल्या ग्रामसभेत लग्नसमारंभातील एकूणच बडेजाव टाळून साधेपणाने लग्न करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
शेतकरी संपाच्या विषयावर आयोजित ग्रामसभेत या वेळी शेती संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. येथील शेतकरी महेंद्र थेटे यांनी लग्नसमारंभात अनेक चुकीच्या प्रथा निर्माण झाल्या आहेत.
त्याबाबतही निर्णय घेण्याचा आग्रह धरला. शेतीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना लग्नसमारंभासाठीचे तसेच विविध विधींसाठीचे खर्च मात्र सतत वाढत आहे. शेतकऱ्यांनी पुढे येऊनच याला आळा घातला, तर त्याचे चांगले परिणाम समोर येतील. यातून अडचणीतील शेतकऱ्याला दिलासा मिळेल, असा विचार मांडण्यात आला. सभेस जमलेल्या ग्रामस्थांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
परशराम गायकर म्हणाले, की हळद, नवरदेव काढणे यासाठीचा कार्यक्रम गरजेपेक्षा मोठा केला जातो. या अनावश्यक प्रथा आहेत. त्या थांबल्याच पाहिजेत. शिवाजी भोर म्हणाले, की लग्नासाठी खूप मोठ्या संख्येने लोक जमावेत, यासाठी आग्रह धरणे चुकीचे आहे. पाचशेच्या वर होणारी पाहुण्यांची संख्या नियंत्रित ठेवली तरी खर्चाला बराचसा आळा बसेल. शेतकरीहिताच्या या निर्णयांचे उपस्थित ग्रामस्थांमधून स्वागत करण्यात आले.
आधीच शेती तोट्यात; त्यात या निरुपयोगी प्रथांमुळे लग्न करताना वधू व वर पित्याचा जीव मेटाकुटीला आला आहे. गरज नसताना नाहक खर्च होतो. हाच खर्च उपयुक्त बाबींवरही खर्च करता येईल. लग्नसमारंभात बडेजाव करणाऱ्या व्यक्तींच्या लग्नावरच बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.''
- निवृत्ती घुले, गिरणारे.
हे ठराव झाले संमत...
- हळदीचा कार्यक्रम छोटेखानी
-नवरदेव काढण्यासाठी अनावश्यक गर्दी नाही
-जागरण व गोंधळात गाव जेवण बंद
-लग्नात फेटे बांधण्यावर बंदी
-धार्मिक विधीत टॉवेल-टोपी देण्याची प्रथा बंद
-मोठा खर्च करणाऱ्या लग्नावर बहिष्कार
|