नाशिक - शेतकरी संपामुळे नाशिक जिल्ह्यातील 19 कृषी उत्पन्न बाजार समित्यांत शेतमाल येणे बंद झाल्याने पाच हजार माथाडी कामगारांना कोणतेही काम राहिले नाही. त्यांना रोज 25 लाखांच्या हमाली, तोलाईवर पाणी सोडावे लागत आहे. यामुळे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील 19 बाजार समित्यांत कार्यरत असलेले पाच हजार माथाडी कामगार रोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करतात. मनमाड, येवला, लासलगाव, पिंपळगाव व उमराणे या बाजार समित्यांत सर्वाधिक काम असते. त्यामुळे तेथे कमाईसुद्धा चांगली होते. मात्र, कालपासून शेतमाल येणे बंद झाल्याने या माथाडी कामगारांना केवळ बाजार समितीत जाऊन बसावे लागत आहे. सरासरी प्रत्येकी पाचशे रुपयांची रोजची कमाई बुडत असल्याने माथाडी कामगारांचे एकूण 25 लाखांचे या संपामुळे नुकसान झाले आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
|