नाशिक - उसाला हमी भाव मिळत असला तर इतर पीक उत्पादक मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. सरकार इकडे लक्ष द्यायचे सोडून लाभार्थी शोधत आहे. पण या सरकारचे लाभार्थी केवळ मंत्री असून एकदाचे या मंत्र्यांचे फोटो टाकून जाहिराती द्याव्यात म्हणजे झाले. या सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी ही ऐतिहासिक फसवणूक आहे, अशा शब्दात विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी आज कृषिथॉन या प्रदर्शनाच्या उदघाटन कार्यक्रमात सरकारच्या धोरणावर ताशेरे ओढले.
येथील ठक्कर डोम येथे आज विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील व विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषिथॉन या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कृषिथॉनच्या उद्घाटनप्रसंगी राज्यातील युवा, महिला, प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी राधाकृष्ण विखेपाटील यांनी कृषी प्रदर्शनांमधून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान बघावयास मिळते व ते तंत्रज्ञान शेतात राबवून शेतकरी प्रगती करीत आहेत, याचा भाषणातून आढावा घेतला. तसेच अनेक शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी आंदोलन करीत असल्या तरी त्यांनी आंदोलन करतानाच एखादा आदर्श प्रयोगही सरकारसमोर करून दाखवला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
|