नाशिक रोड - दिवाळीच्या पूर्वसंध्येला हिंगणवेढे (नाशिक) गावातील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली.
आदित्य हरिश्चंद्र माळी (वय 16) व सूरज देविदास पवार (वय 18) हे दोघे गुरे चारण्यासाठी गेले होते. बराच वेळ होऊनही दोघे घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. हिंगणवेढे येथे असलेल्या तलावाच्या डबक्याजवळ त्या दोघांचे कपडे आढळून आले. त्यामुळे ते तलावात अंघोळीसाठी गेल्याचा संशय बळावला.
नाशिक रोड पोलिसांना ही घटना समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. बऱ्याच प्रयत्नांनंतर आदित्य व सूरज यांचे मृतदेह आढळून आले. सूरज हा हिंगणवेढे येथील नाईक शिक्षण संस्थेत दहावीत होता. त्याचे वडील एसटीमध्ये ड्रायव्हर आहेत, तर आदित्य याचे वडील शेतमजूर आहे. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
|