धुळे - "खेळाडूंनी काय, केव्हा व किती खावे? या त्रिसूत्रीविषयीतून आहार कसा असावा? यावर मुंबई येथील नॅशनल ऍकॅडमी ऑफ स्पोर्टस् मॅनेजमेंट आणि इंपिरियल इंटर-नॅशनल स्पोर्टस् ऍकॅडमीच्या स्पोर्टस् न्यूट्रिशनतज्ज्ञ जाई राजेशिर्के यांनी खेळाडूंसह पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधून मार्गदर्शन केले.
जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे झालेल्या कार्यक्रमात श्री. राजेशिर्के यांनी विविध आहाराबाबत विविध टिप्स दिल्या. पालकांना व खेळाडूंना प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्व व जीवनसत्त्वाचे प्रकार, विविध खनिजे यांची माहिती सांगून खेळाडूंना काय, केव्हा व किती खावे? या त्रिसूत्रीविषयी समजू शकेल, अशा सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले.
खेळाडूंना प्रथिनांची गरज खेळानंतर जास्त असते. घामावाटे होणाऱ्या डी-हायड्रेशनपासून बचावासाठी लिंबू-सरबत अथवा ग्लुकोज पाणी पिणे फायद्याचे असते. लहान मुलांनी स्वतःच्या हाताने खाणे चांगले म्हणून ग्रीप फूडच्या रेसिपीज, मुलांना न आवडणारी भाजी फक्त कलात्मकपणे चिरून त्या भाजीचे ताटातील रूप बदलणे, विविध कडधान्ये, डाळी, धान्ये, दुग्धजन्य पदार्थ, भाज्या आणि फळे यांचे दिवसभरात कसे नियोजन करावे. शेवटी प्रश्नोत्तरे घेऊन पालकांच्या शंकांचे निरसनही केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिम्नॅस्टिक्सचे ज्येष्ठ प्रशिक्षक जगदीश राजेशिर्के व प्रशिक्षक परवेज शेख यांनी विशेष प्रयत्न केले.
|