कोळशाअभावी निर्मितीत घट; चार हजार मेगावॉटने वाढली मागणी
जळगाव - अत्यल्प पावसामुळे ऐन पावसाळ्यातच पिकांना मोटारीने पाणी देण्याची वेळ, उकाड्याने विजेचा वापर वाढलेला असताना कोळशाअभावी निर्मिती मात्र कमी होऊ लागल्याने "ऑक्टोबर हीट'मध्ये भारनियमनाचे चटके बसू लागले आहेत. मागणी व पुरवठ्यातील तफावत वाढल्याने राज्यभरात ग्रुप "जी'मधील फीडरवर सुमारे आठ तासांचे भारनियमन करण्यात येणार असून, सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
यंदा राज्यातील किरकोळ भाग वगळता सर्वत्रच अत्यल्प पाऊस झाला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तर बहुतांश ठिकाणी सरासरीच्या 60 टक्केही पाऊस झालेला नाही. अशा स्थितीत पावसाळा संपण्याआधीच पिकांना मोटारीने पाणी देण्याची वेळ येऊन ठेपली. शिवाय, "ऑक्टोबर हीट'ने उकाडा जाणवू लागल्याने पंखे, एसीचा वापरही वाढला. परिणामी, विजेच्या मागणीत वाढ झाली. तर दुसरीकडे कोळशाची टंचाई जाणवू लागली असल्याने वीजनिर्मितीचे प्रमाण घटले आहे. परिणामी, आता भारनियमनाचे भूत पुन्हा मानगुटीवर बसले आहे.
महावितरणचे नियोजन फसले
पहिल्या टप्प्यात ग्रुप "जी'मध्ये असलेल्या फीडरवर नऊ तासांपर्यंत भारनियमन सुरू झाले आहे. विजेची वाढती मागणी आणि निर्मिती यातील तफावत भरून काढण्याचे नियोजन "महावितरण'कडून होऊ शकले नाही. "ऑक्टोबर हीट' सुरू झाल्यानंतर उकाड्यात होणारी वाढ आणि या दिवसांत पिकांना पाणी देण्यासाठी सुरू होणाऱ्या मोटारींमुळे विजेची मागणी वाढत असते. वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाची उपलब्धता कमी होत असल्याने राज्यात तात्पुरते का असेना, परंतु भारनियमनास सुरवात झाली आहे. विजेच्या मागणीत तीन ते चार हजार मेगावॉट वाढ झाली असल्याने ग्रुप "जी'मधील फिडरवर भारनियमन सुरू करण्यात आले आहे. आणखी काही दिवस मागणी व पुरवठा यात ताळमेळ बसला नाही, तर एकेक टप्प्यात ग्रुपनुसार भारनियमन सुरू करण्यात येणार आहे.
|