‘समृद्धी’साठी पर्यायी मार्गाचा विचार

‘समृद्धी’साठी पर्यायी मार्गाचा विचार

नाशिक - प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला सिन्नर व इगतपुरी तालुक्‍यांतील बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाचे सचिव राधेश्‍याम मोपलवार यांनी आज शेतकऱ्यांना बागायती गावे वगळून महामार्ग डोंगराळ भागातून नेण्याची तत्त्वतः तयारी दर्शवली. अत्यंत सकारात्मक चर्चेनंतर शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले असले, तरी महामार्गासाठी जमीन खरेदीची जाहीर नोटीस दिलेली असताना या आश्‍वासनावर कितपत विसंबून राहायचे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मनात आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सिन्नर व इगतपुरी या तालुक्‍यांमधील ४६ गावांमधून जातो. त्यात इगतपुरी तालुक्‍यातील २० व सिन्नर तालुक्‍यातील २६ गावांचा समावेश असून, सिन्नर तालुक्‍यातील १२-१३ गावांमधील बागायती क्षेत्रामधून हा महामार्ग जात आहे. तसेच इगतपुरी तालुक्‍यातील महामार्ग जाणारी बहुतांश गावेही बागायती क्षेत्रातील आहेत. यामुळे या बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी करण्यास तीव्र विरोध केला आहे. त्यातूनच शिवडे येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊन ते गाव आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचे म्हणणे शासनापर्यंत पोचविण्यासाठी माजी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज सिन्नर तालुक्‍यातील शेतकरी व राज्य रस्ते विकास महामंडळाचे सचिव राधेश्‍याम मोपलवार यांची एकत्र बैठक घडवून आणली. 

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर श्री. मोपलवार यांनी शेतकऱ्यांशी सकारात्मक पद्धतीने संवाद साधला. ते म्हणाले, की तुमच्या भागातून जाणाऱ्या महामार्गामध्ये विहिरी, घरे, बागायती क्षेत्र याचे प्रमाण मोठे असल्याचे आम्हाला माहिती आहे. यामुळे या भागातील १२ ते १३ बागायती गावे वगळून महामार्ग शेजारच्या डोंगराळ भागातून नेण्याबाबत सरकार विचार करीत आहे. तुमचा जमिनी देण्यास विरोध असेल, तर सरकार तुमच्याकडून जमिनी घेण्याबाबत बळाचा वापर करणार नाही, याबाबत निश्‍चिंत राहा. पर्यायी मार्गाचा विचार करून बागायती शेतीचे कमीत कमी नुकसान करून महामार्ग नेला जाईल, असा शब्द दिल्याने शेतकरी आनंदाने बैठकीतून बाहेर पडल्याचे तेथे उपस्थित शेतकऱ्याने ‘सकाळ’ला सांगितले.

इंचभरही जमीन नाही
सिन्नरच्या पश्‍चिम पट्ट्यातील दहा-बारा गावांमधील संपूर्ण क्षेत्र बागायती असून, बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. महमार्गामुळे जवळपास सर्वच शेतकरी भूमिहीन होणार असल्याने महामार्गाला जमिनी दिल्यानंतर त्यांच्या उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण होणार असल्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत या महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नसल्याचे शेतकऱ्यांतर्फे रावसाहेब हारक व सोमनाथ वाघ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com