सुसाट्याच्या वादळासह पावसाचा तडाखा ; घरे, पोल्ट्री, शेडनेट, पॉली हाऊसचे नुकसान

rain.jpg
rain.jpg

येवला : पहिल्याच पावसाच्या तडाख्यात तालुक्यातील शेतकरी भिजून नव्हे तर भाजून निघाला असून सुमारे दोन कोटीपेक्षा अधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. महसूल विभागाच्या दप्तरी ९० शेतकऱ्यांचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. शुक्रवारी सायंकाळी व रात्री पूर्व भागात व इतरत्रही पावसाने हजेरी लावली. यात महावितरणचे खांब पडून व तारा तुटून सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले आहे. आज शनिवारी देखील सायंकाळी  महालखेडा, भिंगारे, नेऊरगाव, चिचोंडी या परिसरात जोरदार पाऊस पडला.

अचानक आलेल्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपासून ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान ठिकठिकाणी मोठी हाणी केली. आवर्षण प्रवण पूर्व भागात याची तीव्रता अधिक होती तर सोसाटय़ाच्या वाऱयामुळे शेतकऱयांचे घरासह शाळा, शेडनेट, पॉली हाऊस, कांद्याच्या चाळी, जनावरांचे शेड आदींचे प्रचंड नुकसान झाले आहे. या आपत्तीत सहा जनावरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. आज तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी विविध भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली तर ठिकठिकाणच्या तलाठ्यांनी या नुकसानीचे पंचनामे व नुकसानीचे आकडे एकत्रित केले आहेत.

डोंगरगावच्या कचरू सोमासे यांच्या बैलावर अंगावर भिंत पडून तर गाईवर झाड पडून, गंगाधर बागूल यांच्या शेळीवरही झाड पडून तर खैरगव्हाणच्या विनायक घुसळे यांच्या तीन शेळ्या ठार झाल्या आहेत. सर्वाधिक नुकसान डोंगरगाव येथे झाले असून बारा शेतकऱ्यांचे घरावरील, कांदा चाळीचे पत्रे उडाले व जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच येथील महादेव मंदिर व नरसिंग माता मंदिराचे देखील पत्रे उडाले. सुरेगाव रस्ता, गारखेडे, देवळाणे येथील तीन शेतकऱ्यांचे घरावरील पत्रे उडून व घराची भिंत पडून नुकसान झाले.

बोकटे, देवळाने भागात पॉली हाउस, शेटनेट उन्मळून पडत मोठे नुकसान झाले. ममदापूरला पोल्ट्री शेडचे, तर आडगाव चोथवा, ठाणगाव, कानडी, नगरसूल, सुरेगाव रस्ता, अंदरसूल, कोळम, खरवंडी, गुजरखेडे, आडगाव रेपाळ, विखरणी, महालखेडा, भिंगारे या गावात ५० वर शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे व भिंती पडून मोठे नुकसान झाले आहे. कांदाचाळ व जनावरांच्या गोठ्याचेही या भागात नुकसान झाले आहे. या ९० ठिकाणी महसूल विभागाने जाऊन पाहणी केली असून ४८ लाख ७६ हजराचे नुकसान झाल्याची शासकीय दरबारी नोंद केली आहे.

यासोबत वादळी वाऱ्याने महावितरणला मोठा झटका बसला असून चार मनोरे आणि २१० विजेचे खांब पडले. यामुळे महावितरणचे २० लाखावर नुकसान झाले आहे. यामुळे सुमारे १२ तासापर्यत ३० गावे अंधारात होती. तर आज सकाळ पासून कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती मोहीम राबवल्याने २४ गावाचा वीजपुरवठा दुपार नंतर सुरळीत झाला मात्र भारम, कोळम, कौटखेडे, डोंगरगाव, रहाडी या गावात सायंकाळ पर्यत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com