रवींद्र जाधव खून प्रकरण: मारेकऱ्यांचा खोटेपणा पोलिसांनी पाडला हाणून  

crime_logo
crime_logo

मेहुणबारे (चाळीसगाव) - जुन्या वादाचा बदला घेण्याची हिच संधी आहे आणि ती सोडायची नाही, अशी मनाशी खुणगाठ बांधून रवींद्र जाधवच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या तिघांनी तांड्यावरील एका निष्पाप तरुणाचे नाव पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तिघा संशयितांचा खोटारडेपणा हाणून पाडला व निर्दोष असलेल्या तरुणाचे आयुष्य उद्‌ध्वस्त होण्यापासून वाचवले. 

कृष्णापुरी तांडा येथील बेपत्ता रवींद्रचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्याचा खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या खून प्रकरणी हिंमत उर्फ अजय चव्हाण, सचिन जाधव व राहुल जाधव यांना पोलिसांनी लगेचच अटक केली. त्यांची चौकशी सुरु केल्यानंतर त्यांनी "रवींद्रला मारणारे आम्ही तिघे नसून गावातील जगन जाधव याचाही सहभाग आहे', असे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसाचा संशय जगनवर बळावला. मात्र, या घटनेचा तपास करताना पोलिसांनी अतिशय सावधानता बाळगली. तिघांपैकी एकेकाला पोलिसांनी विश्‍वासात घेऊन त्यांची विचारपूस केली. तिघांना स्वतंत्रपणे वेगवेगळ्या पद्धतीने विचारल्यानंतर रवींद्रचा खून या तिघांनीच केल्याचे चौकशीत आढळून आले. चौकशीत सुरवातीला तिघेही जगन जाधवचे नाव घेत होते. मात्र, त्यांची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर या तिघांनीच जगनला देखील यात अडकवायचे असा पूर्वनियोजित प्लान केलेला होता. आपण पोलिसांना सापडलो तर जगनचे नाव सांगू असे तिघांनी ठरवले होते. 

जगनचेच नाव का सांगितले?
तिघा संशयितांना पोलिसी खाक्‍या दाखवल्यानंतर त्यांनी जगनचे नाव या खून प्रकरणात का घेतले, याचे कारण सांगितले. संशयित सचिन जाधव याच्या मामाचा आणि जगनचा तीन वर्षापूर्वी वाद झालेला होता. त्या वादाचा बदला घेण्यासाठी जगनला या खून प्रकरणात अडकविण्याचा आम्ही प्लॅन केल्याचे या तिघांनी सांगितले. पोलिसांनी तब्बल 48 तास जगनची चौकशी केली. त्यात तो देखील त्याचा जुना वाद असल्याने ते माझे नाव घेत असल्याचे सांगत होता. पोलिसांनी योग्य पद्धतीने तपासाची चक्रे फिरवल्यामुळेच जगनचे नाव या खून प्रकरणात आले नाही. अन्यथा काहीही एक संबंध नसताना निष्पाप जगनवर कारवाईची टांगती तलवार काही दिवस राहिली असती. ज्यामुळे त्याचे आयुष्य देखील उद्‌ध्वस्त होऊ शकले असते. 

साहित्य केले जप्त 
रवींद्रचा खून करण्यासाठी व खून केल्यानंतर जे जे साहित्य वापरले होते. ते तिघा संशयितांनी पोलिसांना धरणालगतच्या शेताच्या परिसरातून काढून दिले. ज्यात हत्यार, फावडे, टिकाव, लोखंडी टामी या वस्तूंचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या तिघांकडून आणखीन काही नवीन माहिती मिळते का या दृष्टीने पोलिस त्यांची चौकशी करीत आहेत.

पोलिसमित्र असूनही चौकशीच्या फेऱ्यात...
या खून प्रकरणात जगनचे नाव संशयितांनी घेतल्यानंतर पोलिसांनी अनेकांशी त्यासंदर्भात विचारपूस केली.शिवाय त्याचा कृष्णापुरी येथील संशयितांसोबतच जुना वाद असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले.जगन हा पोलिसमित्र असूनही पोलिसांनी त्याला संशयी म्हणूनच वागविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com