शहापूर - शहापूर तालुक्यातील धबधब्यांबरोबरच भातसा व तानसा धरण परिसरात गेल्या काही वर्षांत 82 पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यानुसार, माहुली किल्ला व धबधबा, विहीगाव येथील अशोका धबधबा, भातसा व तानसाच्या पाचशे मीटर परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
माहुली धबधब्याखालील डोहात काही दिवसांपूर्वी दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला; तर एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. भातसा व तानसा धरणात पाणीसाठा वाढल्यानंतर, धरणाचे दरवाजे यांत्रिकरीत्या आपोआप उघडले जातात. परिणामत: धबधब्यांच्या ठिकाणी पाण्यात अचानक मोठी वाढ होऊन पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली आहे.
या आदेशामुळे आता या परिसरातील धबधब्यात पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पाण्यात उतरणे, पाचशे मीटर परिसरात वाहने घेऊन जाण्यास बंदी राहील. पावसामुळे धोकादायक झालेल्या ठिकाणी किंवा कठड्यांवरून मोबाईलद्वारे सेल्फी काढणे, छायाचित्रे काढणे, चित्रीकरण करणे, मद्यप्राशन करणे, मद्य बाळगण्यावरही बंदी करण्यात आली आहे.
|