'वरखेडे' प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा 

'वरखेडे' प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या सुलवाडे, शेळगाव बॅरेज व गिरणा नदीवरील वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात आज दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील हे प्रकल्प मे 2019 मध्ये पूर्ण होतील, अशी घोषणा केली. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील बळीराजा संजीवनी योजनेत 108 व प्रधानमंत्री सिंचन प्रकल्प योजनेतील 26 प्रकल्प मे 2019 पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा केली. सध्या सुरू असलेला पावसाळा संपल्यानंतर युद्धपातळीवर कामे केली जाणार आहेत. चाळीसगाव तालुक्‍यातील वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाचे काम सध्या पावसाळा असल्याने बंद केले आहे. या कामासाठी वित्त विभागाची सर्वांत महत्त्वाची परवानगी यापूर्वीच मिळाली होती. ज्यात 526 .64 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तालुक्‍याचे आमदार उन्मेष पाटील यांनी या प्रकल्पासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. खासदार ए. टी. पाटील यांनीही दिल्लीत मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केली होती. हा प्रकल्प आता मे 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ठ आहे. 

चाळीसगाव व भडगाव या दोन्ही तालुक्‍यातील सिंचनाची क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाच्या कामाला 2013 पासून सुरवात झाली होती. या कामाला वेळोवेळी पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने काम कधी बंद तर कधी चालू अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मंत्री गडकरी यांच्या घोषणेने पुन्हा या कामाला गती मिळणार आहे. 

तीन वर्षात 97.73 कोटीचा निधी 
वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पासाठी सन 2014-15 मध्ये 10.24 कोटी, 2015-16 मध्ये 19.54 कोटी, 2016-17 मध्ये 13 कोटी, 15 कोटी अतिरिक्त आणि 2017-18 मध्ये 40 कोटी असा आतापर्यंत 97.73 कोटीचा निधी मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. सद्यःस्थितीत या प्रकल्पाच्या डाव्या बाजूच्या पायाचे काम पूर्ण झाले आहे. उजव्या बाजूचे काम देखील पूर्णत्वास येत आहे. नदीपात्रातील मुख्य धरणाच्या कामाला लवकरच सुरवात होणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे 7 हजार 542 हेक्‍टरला सिंचनाचा लाभ होणार आहे. बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com