पाण्याच्या आणीबाणीत योजनांना लागले कुलुप

water-crisis
water-crisis

येवला - अवर्षणप्रवण, टंचाईग्रस्त, दुष्काळी अशी बिरुदे घेऊन वाटचाल करणाऱ्या येवल्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजनेने टंचाईमुक्त केले आहे. तर ७१ गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजलच्या योजना आहेत मात्र या योजना सिजनेबल आठमाही ठरत असल्याचे चित्र आहे. यंदा तर पाण्याची पातळी प्रचंड खालावल्याने तसेच इतर कारणांमुळे ४० वर पाणीपुरवठा योजनांना कुलूप लावण्याची वेळ ग्रामपंचायतींवर आली आहे. योजना सुरळीत चालण्यासाठी कुठे पाण्याचा तर कुठे पाणीदार नेतृत्वाचा अभाव जाणवत आहे.   

उन्हाळ्यातील चार महिने म्हणजे उत्तर-पूर्व भागातील ५० वर गावे अन वाड्या वस्त्यावर पाण्याची आणीबाणी स्थिती असते. किमान ६० वर ठिकाणी टँकरने तहान भागवण्याची वेळ दरवर्षी येतेच. राज्यातील ९४ कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्यात येवल्याचे नाव अग्रभागी आहे. यामुळेच पाणीटंचाईसाठी हाल येथील नागरिकांच्या नशिबी लिहिलेले आहेत. यंदा तर पूर्व भागात पावसाने दगाबाजी केल्याने भर पावसाळ्यात अनेक जलस्रोत कोरडेठाक होते. परिणामी भूजल पातळी प्रचंड खालावल्याने व बंधारे व विहिरी, कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. याचमुळे जानेवारीपासुनच यावर अवलंबून असलेल्या पाणी योजना माना टाकत आहेत. यावर्षी पाणीबाणी स्थिती असल्याने बंद पडलेल्या पाणी योजनांची संख्या जास्त आहे. आटलेले अन कोरडे झालेले उद्भव मात्र योजनांना कुचकामी ठरत आहेत. अनेक गावात या योजना हक्काच्या राहिलेल्या नसून, जसे पाणी मिळेल तसे गावाला पुरवले जाते असे चित्र असल्याने योजना देखील आठमाही, दहामाही ठरल्या आहेत.

एकीकडे योजना असल्याने गाव टंचाईमुक्त असल्याचे कागदावर दिसत असल्याने यंदा अनेक गांवाना टँकर सुरु करण्यासाठी देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली आहे. तालुक्यात ६० गावे व वाड्यावर कुठे टँकर सुरु आहे तर कुठे मागणी झाली आहे. यातील राजापूर, ममदापूर, अनकाई, बाळापुर सारखी गावे तर योजना आहे पण त्यांना पाणी नसल्याने टँकरवर तहान भागवत आहेत.  

४१ गावांना नवी योजना...
पाण्याचे स्रोत नसल्याने तालुक्यात मोठ्या पाणी योजनांचा अभाव आहे. अवर्षणप्रवण गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग काढण्याकरिता नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे.हि योजना कागदावर आली असून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी या प्रस्तावित असलेल्या योजनेचा मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा २ मध्ये समावेश केला जाईल. असे आश्वासन नुकतेच दिले आहे.हि योजना झाली तर मोठा आधार मिळनार आहे.

योजना केवळ कागदावरच...
तालुक्यात ७१ पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. यातील २०च्या आसपास योजना सुरु असून, त्यातही कुठे दिवसाआड तर कुठे आठवड्यातून एकदा गावाला पाणी पुरवले जात आहेत. तर अनेक योजना अडकल्या आहेत. राजापूर, नायगव्हान, फरताळवाडी, ममदापूर, बाळापुर, ठाणगाव,
हडप, सावरगाव, जायदरे, नागडे, पन्हाळसाठे, कासारखेडे, देवरगाव येथील योजना वीजबिल थकल्याने तसेच पाणी नसल्याने अडगळीत पडल्या आहेत.

आकड्यात पाणीयोजना....

  • एकूण मंजूर योजना - ७१ 
  • पूर्ण झालेल्या योजना - ९
  • भौतिकदृष्ट्या पूर्ण - ८
  • अंतीम झालेल्या योजना - २९
  • पाणीपुरवठा सुरु - ७
  • प्रगतीत योजना - १०
  • उद्भव कोरडा - ५
  • समिती काम करत नाही - ४
  • वीजबिल थकबाकी - २
  • सुधारित प्रस्ताव शासनाकडे - १

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com