कृष्णापुरीत पाणी सोडल्यावरून तालुक्यात श्रेयवाद

krushnapuri dam
krushnapuri dam

पिलखोड (ता. चाळीसगाव) : कृष्णापुरी (ता. चाळीसगाव) धरणात ठणठणाट असल्याने त्यात गिरणातून पाणी सोडण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली होती. त्याला पाठबळ म्हणून 'सकाळ'ने वारंवार बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. अशा संयुक्तिक प्रयत्नांना यश लाभत गिरणातून कृष्णापुरीत पाणी सोडले गेले. परंतु तालुक्यात सध्या वेगळ्याच श्रेयवादाची पोळी भाजली जात आहे.

गतवर्षी समाधानकारक पर्जन्यमान नसल्याने कृष्णापुरी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. होता तेवढा 18 टक्के पाणीसाठा तोही पाणी चोरांनी चोरून नेला. यामुळे धरणात ठणठणाट होता. स्थानिक रहिवासी आणि गुराढोरांचे पाण्यावाचून हाल होत होते.  शासन दरबारी शेतकऱ्यांनी गिरणातून पाणी सोडावे या मागणीसाठी तगादा लावून धरला होता. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तरी, शेतकऱ्यांच्या पदरी काहीच फलित नव्हते. 

शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा 'सकाळ'कडे मांडल्या. त्यावरून सकाळने शेतकऱ्यांच्या वेदना आणि तिथल्या पाणी टंचाईची धग अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना करून दिली. त्यानंतर कृष्णापुरीच्या पाणीटंचाईचा विषय चर्चेत आला. त्यावेळी काहींनी आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्नही केला. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर पाण्यासाठी उपोषण केले. या उपोषणात कृष्णापुरीचे शेतकरीच होते. त्यात कुठल्याही राजकीय पक्षाचा सहभाग अथवा नेतृत्व नव्हते. त्यामुळे उपोषणाला कुठलाच राजकीय 'टच' असल्याचा संबंध नाही.

तालुक्याचे लोकप्रतिनिधी व जबाबदारी म्हणून आमदार उन्मेष पाटील यांनी ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करत आपल्या पातळीवर पाठपुरावा केला. मात्र, हे खरे यश कृष्णापुरीच्या शेतकऱ्यांचे तसेच शासन दरबारी बातम्यांच्या माध्यमातून विषय लावून धरणारे 'सकाळ'चे आणि आमदारांच्या पाठपुराव्याचे आहे. 

कृष्णापुरी धरणात पाणी सोडल्याने तेथील पाणी प्रश्न काही प्रमाणात मिटला असला, तरी राजकीय श्रेयवादाचा प्रश्न नव्याने पेटला आहे. तालुक्यातील काही तथाकथित पुढारी हे आपल्यामुळेच कृष्णापुरीत पाणी सोडल्याचे श्रेय घेत आहेत. तेथील रहिवासी हे भोळेभाबळे नसून कुणामुळे धरणात पाणी सुटले; हे त्यांना चांगलेच माहिती आहे. दरम्यान याला राजकीय असे काहीच महत्व नसल्याने कुठल्या गोष्टीचे श्रेय आपण घ्यावे, हा देखील विचार करण्यासारखा विषय आहे. 

तहसील कार्यालयात केलेल्या उपोषणास कुठल्याही राजकीय पक्षाचा सहभाग नव्हता. ते सर्व शेतकरी मिळून होते. आमच्या या लढाईत 'सकाळ'ने आमची साथ दिली त्यामुळे हे यश आमच्याबरोबर 'सकाळ'चेही आहे.
- रुपसिंग जाधव, शेतकरी, कृष्णापुरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com