एकरी ५० क्विंटल कापूस उत्पादनाचा ‘अमृत पॅटर्न’

एकरी ५० क्विंटल कापूस उत्पादनाचा ‘अमृत पॅटर्न’

यवतमाळच्या शेतकऱ्याचा आदर्श - इतरांना दिला सक्षम पर्याय

नागपूर - कापसाच्या शेतीसाठी साधारणपणे ३० हजार रुपयांचा खर्च येतो. परंतू, उत्पन्न देखील जवळपास तेवढेच मिळते. त्यामुळे कापसाची शेती तोट्याची होत आहे. परंतु, याच खर्चामध्ये आणखी २० हजार रुपयांनी वाढ केल्यास आणि अमृत पॅटर्नने कापसाची लागवड केल्यास त्यापासून शेतकरी किमान दोन ला रुपयांचे उत्पन्न घेऊ शकतात. ते यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने शक्‍य करुन दाखविले आहे.

अमृत देशमुख मु.पो.आंबोडा महागाव जिल्हा यवतामळ असे अमृत पॅटर्न विकसीत करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. देशमुख यांच्याकडे १२ एकर शेती आहे. यात ते कापूस, सोयाबीन, तूर, भूईमूग, ऊस आदी पिकांची लागवड करतात. गेल्या पाच वर्षांपासून कापसासाठी नवनवीन प्रयोग करीत आहेत. मागील वर्षी त्यांनी ४ एकरवर ७१५१ व राशी ६५९ या प्रजातीच्या कापसाची लागवड केली. पंरतु, ती पांरपारिक पध्दतीने न करता स्वत:च लागवड पध्दत विकसीत केली. त्या पध्दतीला अमृत पॅटर्न असे नाव दिले. कापसाची लागवड करताना त्यांनी पट्टा पद्धतीने उत्तर दक्षिण अशा स्वरूपात केली. रासायनिक आणि शेण खताचा वापर केला. एकाचवेळी खताची मात्रा न देता दहा ते पंधरा दिवसांच्या अंतरावर दिले. 

उत्तर-दक्षिण पद्धतीने झाडांची लागवड केल्याने भरपूर सूर्यप्रकाश मिळून झाडांची चांगली वाढ झाली. शिवाय झाडांना भरपूर फांद्या फुटल्याने बोडांची संख्या वाढली. कापसाच्या झाडांना बांबू आणि ताराचा आधार देण्याचा प्रयोग प्रथमच केला.एक एकर लागवडीचा खर्च ५० हजार रुपये आला. 

अमृत पॅटर्नमुळे त्यांनी एकरी ५१ क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले. सर्व खर्च जाता एकरी दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला. देशमुख यांच्या प्रयोगाची कृषी विद्यापीठाने घेतली. त्यांना विद्यापीठात बोलावून एकरी ५१ क्विंटल कापसाचे उत्पादन घेण्याचे तंत्र, पट्टा पध्दती आणि अमृत पॅटर्न समजून घेतला. कापूस उत्पादकांनी या पध्दतीचा अवलंब करुन चारपैस अधिकचे मिळविणे शक्‍य असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांनी अवलंब करावा

विदर्भातील शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी अमृत पॅटर्नचा अवलंब करावा, असे आवाहन महाविदर्भ जनजागरणचे संयोजक नितीन रोंघे यांनी केले. गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील  शेतकरी देशमुख यांच्या शेताला भेट देऊन माहिती घेत आहेत. राज्य सरकारने यास प्रोत्साहन द्यावे, असे या वेळी शेतीतज्ज्ञ सुधीर केदार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com