चव्हाण यांना हटविण्याच्या हालचाली सुरू 

चव्हाण यांना हटविण्याच्या हालचाली सुरू 

नागपूर - महापालिका निवडणुकीतील पराभवामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीतून प्रदेशाध्यक्ष कोण आणि कसा हवा, अशी विचारणा स्थानिक नेत्यांना केली जात आहे. यावरून चव्हाण विरोधकांच्या मागणीला यश येत असल्याचे बोलले जात आहे. नेतृत्व बदलावर मुंबईत घमासान सुरू असल्याचे कळते. 

मुंबईसह नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला. "आदर्श'ची फाइल उघडेल, या भीतीने सर्व महापालिका भाजपला बहाल केल्याचा आरोप कॉंग्रेसचेच नेते करीत आहेत. सोनिया आणि राहुल गांधी यांच्याकडे पत्रांच्या माध्यमातून तक्रारीसुद्धा करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहर असलेल्या नागपूरमध्ये पक्षाची वाताहत झाली आहे. कॉंग्रेसचे फक्त 29 नगरसेवक निवडून आले आहेत. याचे सर्वस्वी खापर प्रदेशाध्यक्षांवर फोडण्यात आले आहेत. सक्षम आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना तिकीट नाकारण्यात आले. डबल एबी फॉर्म वाटप करण्यात आले. दोन ते तीनवेळा निवडून आलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली. माजी मंत्री, आमदारांनाही विश्‍वासात घेतले नाही. कुठल्याचे नेत्यांचे ऐकले नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. अनेक कार्यकर्त्यांनी प्रचारच केला नाही. पाडापाडीचेच राजकारण केले. प्रदेशाध्यक्षांनी ज्यांना आग्रहाने तिकट दिल्या ज्यांना अधिकार बहाल केले होते. तेसुद्धा पराभूत झाले आहेत. यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, या दरम्यान, घडलेल्या घडामोडींची चौकशी करण्याची मागणी नागपूरमधून राहुल आणि सोनिया गांधी यांच्याकडे करण्यात आली होती. घटना, घडामोडींचे दस्तऐवजसुद्धा पाठविण्यात आले होते. याची दखल घेण्यात आल्याची चर्चा आहे. सोमवारी दिल्लीतून काही नेत्यांना फोन आले. तुम्हाला कोण आणि कसा प्रदेशाध्यक्ष पाहिजे आहे, याची विचारणा करण्यात आली, याची माहिती देण्याचेही कळविले आहे. याचा अन्वयार्थ प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असा काढला जात आहे. 

कॉंग्रेसचा ग्राफ घटला 
एकेकाळी नागपूर कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. संघाच्या भूमीत आज एकही आमदार नाही. महापालिकेची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. 41 नगरसेवक मागील कार्यकाळत होते. ही संख्या 29 वर आली. कॉंग्रेसच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. तातडीने नेतृत्वात फेरबदल केले नाही, तर कॉंग्रसचे अस्तित्वच संपून जाईल, असे एका बड्या नेत्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com