जिल्ह्यात विक्रमी धानखरेदी

जिल्ह्यात विक्रमी धानखरेदी

भंडारा - काही वर्षांतील धानखरेदीचे विक्रम मोडीत काढत सहकारी संस्थांच्या मदतीने जिल्हा पणन महासंघाने या वर्षी जिल्ह्यात 9 कोटी 95 लाख 55 हजार 610 क्विंटलचा आकडा गाठला आहे. या सत्रात 24 ऑक्‍टोबरला शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्र सुरू झाले. सातही तालुक्‍यांतील 61 आधारभूत केंद्रांवर 31 मार्चपर्यंत पाच महिन्यांच्या कालावधीत 27 हजार 358 शेतकऱ्यांकडून 9 कोटी 95 लाख 55 हजार 610 क्विंटल धान 31 मार्चपर्यंत खरेदी करण्यात आले. 

खरीप हंगामात भरपूर उत्पादन झाल्याने या वर्षी विक्रमी धानखरेदी झाली. 2015-016 या  6 कोटी, 17 लाख 36 हजार 610 क्विंटल धानाची खरेदी झाली होती. या वर्षी हा आकडा 3 कोटी 78 लाख 19 हजाराने वाढला आहे. या वर्षी शासनाने नियोजित वेळेपेक्षा एका आठवड्यापूर्वीच धानखरेदीला प्रारंभ केला होता. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. धानखरेदीचा ओघ प्रचंड वाढल्याने अनेक ठिकाणी गोदाम तुडुंब भरले. बऱ्याच वेळा धानखरेदीही प्रभावित झाली होती. दरवर्षी 1 नोव्हेंबरपासून आधारभूत खरेदी केंद्रे सुरू केले जातात. मात्र, या वर्षी एका आठवड्यापूर्वीच खरेदीला प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यात 61 आधारभूत केंद्रांवर ही धानखरेदी करण्यात आली. मागील वर्षी 57 केंद्रांवर धानखरेदी करण्यात आली. ही संख्या या वर्षी चारने वाढविली होती. काही संस्थांनी गोदामाचे भाडे व कमिशन या मुद्द्यावरून केंद्रे सुरू करण्यास नकार दिला होता. परंतु, शेतकरी हितापोटी त्यांनी गोदाम भाड्याने देऊन केंद्रे सुरू करण्यास मंजुरी दिली. या 61 केंद्रांवर 24 ऑक्‍टोबर ते 31 मार्च या अंतिम मुदतीपर्यंत 27 हजार 358 शेतकऱ्यांकडून 9 कोटी 95 लाख 55 हजार 610 क्विंटल साधारण ("ब' ग्रेड) धानाची खरेदी करण्यात आली आहे. त्याबदल्यात 146 कोटी 346 लाख 74 हजार 67 रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेमार्फत अदा करण्यात आले. 

सात तालुक्‍यांत झालेली खरेदी 
भंडारा तालुक्‍यात 530 शेतकऱ्यांनी 20 हजार 191. 60, क्विंटल, मोहाडी तालुका 1 हजार 617 शेतकऱ्यांनी 60 हजार 167.20, तुमसर तालुका 5 हजार 229 शेतकऱ्यांनी 1 लाख 80 हजार 573.40, लाखनी तालुका 6 हजार 315 शेतकऱ्यांनी 2 लाख 55हजार 879, साकोली तालुका 5 हजार 96 शेतकऱ्यांनी 1 लाख 90 हजार 893.80, लाखांदूर तालुका 5 हजार 885 शेतकऱ्यांनी 2 लाख 21 हजार 704, पवनी 2 हजार 716 शेतकऱ्यांनी 1 लाख 16 हजार 438.20 क्विंटल असे एकूण 9 कोटी 95 लाख 55 हजार 610 क्विंटल धान खरेदी केंद्रांवर विकले. 

धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ख्याती आहे. खरीप हंगामात समाधानकारक पाऊस आल्याने धानाचे भरघोस उत्पादन आले. जिल्हा पणन महासंघातर्फे तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्था, सहकारी भातगिरण्या, कृषी औद्योगिक सहकारी संस्थांच्या सहकार्याने धानाची खरेदी केली जाते. खरीप हंगामातील धानाची खरेदी आटोपली. आता उन्हाळी धानाची खरेदी सुरू होणार आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, सिंचनाच्या वाढलेल्या सोयी, आधुनिक पद्धतीने होणाऱ्या लागवडीतून धानाचे अधिक उत्पादन आणि केंद्र सरकारतर्फे मिळणारा हमीभाव व बोनस यामुळे शेतकरी सरकारी आधारभूत केंद्रांवर धानविक्रीला प्राधान्य देत असल्याचे दिसते. 

88 टक्के धानाची उचल 
या वर्षी जिल्हा पणन संघाद्वारे खरेदी केलेले धान भरडाई केल्यानंतर थेट जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठविले जात आहे. आतापर्यंत 88 टक्के धान भरडाईसाठी मिलर्सना देण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमध्ये 160 कोटी 53 लाख 20 हजार 450 रुपयांची हुंडी दाखल करण्यात आली. आधारभूत धान केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रति क्विंटल 250 रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांना धानाचा मोबदला म्हणून बोनससह 156 कोटी 92 लाख 66 हजार 263 रुपयांची रक्कम अदा करण्यात आली 3 कोटी 60 लाख 54 हजार 187 रुपयांचे चुकारे थकीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com