नागपूर - राज्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले.
जामखेड (जि. अहमदनगर) येथील शेतकरी धोंडिराम शिरसाट यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागल्याने त्यांनी आत्महत्या केली होती. या संदर्भात सदस्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख यांनी उपरोक्त विधान केले. आधार कार्डशिवाय कर्जमाफी अर्ज पोर्टलवर सादर करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली होती.
राज्यातील 2 लाख 40 हजार आधार कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत. तथापि, उपरोक्त प्रकरणात कर्जमाफीबाबत विशेष बाब म्हणून विचार केला जाईल; तसेच या प्रकरणाची चौकशी करून कोणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
|