यवतमाळ - एकाच शेतकरी कुटुंबातील तिघांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतीक्षालयात विष प्राशन केल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेतील एकाचा काल रात्री सव्वाअकराला शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुंदन गौतम (वय 44, रा. डोल्हारी) असे त्याचे नाव आहे, तर दोघांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.
पाच एकर शेतीचा ताबा मिळावा, यासाठी फिर्याद घेऊन दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथील कुंदन गौतम, उमेश गौतम, आशीष गौतम तिघेही जिल्हाधिकाऱ्यांकडे आले होते; मात्र उशिरापर्यंत प्रतीक्षा करूनही प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्याशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे तिघांनी सोबत आणलेले विष प्राशन केले. एकाच्या तोंडातून फेस निघत असल्याची बाब जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. लगेच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना काल रात्री कुंदन गौतम याचा मृत्यू झाला. उमेश गौतम (वय 32) आणि आशिष गौतम (वय 35) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अतिदक्षता विभागातील डॉक्टरांनी दिली.
|